प्रदीप शिंदे - कोल्हापू ‘गौड सारस्वत ब्राह्मण’ ही दक्षिण भारतातील सारस्वत ब्राह्मणांतील एक पोटजात होय. या समाजाने पूर्वीपासूनच आधुनिकतेची व शिक्षणाची कास पकडत आपला विकास साधला आहे. समाजातील बहुतांशी लोकांनी व्यापार, हॉटेल व्यवसाय व उच्चपदांसह सर्वच क्षेत्रांत ठसा उमटविल्याचे आज पाहायला मिळते. कोल्हापुरातही हा समाज सर्वत्र अग्रेसर आहे. पूर्वीच्या काळी हा समाज विशेष करून गोवा, केरळ किनारपट्टी, महाराष्ट्र व कर्नाटकलगतच्या प्रदेशात आढळून येत होता. मात्र, या समाजाने नोकरी, व्यवसाय, शिक्षणाकरिता आपला प्रदेश सोडून महाराष्ट्रासह इतर राज्यांत स्थलांतर केले. त्याचप्रमाणे १८व्या शतकात यातील काही लोक कोल्हापुरात आले. त्यांनी या ठिकाणी विविध व्यवसायांसह मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली. राजर्षी शाहू महाराजांनी १८ एप्रिल १९०१ रोजी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली. त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी विविध समाजांतील वसतिगृहांची सुरुवात केली. प्रत्येक वसतिगृहास इमारती, खुल्या जागा, कायमस्वरूपी उत्पन्नाची साधने उपलब्ध करून गरीब विद्यार्थ्यांची व्यवस्था केली होती. त्याचप्रमाणेच गौड सारस्वत ब्राह्मण समाजासाठी १९११ मध्ये शाहू महाराजांनी जागा आणि रोख १६०० रुपये देणगी दिली. गौड सारस्वत ब्राह्मण समाजातील नेत्यांनी, आपल्या समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शिक्षणाविषयी कमालीची आस्था असणाऱ्या समाजबांधवांनी देणग्या दिल्याने सारस्वत बोर्डिंग उभारण्यास मोठा हातभार लागला. प्रामुख्याने सन १९१४ मध्ये सरस्वतीबाई लाटकर यांनी १० हजारांची देणगी दिल्याने बोर्डिंगच्या इमारत बांधकामास प्रारंभ झाला. अल्पावधीतच इमारत उभी राहिली. राजर्षी शाहूंच्या हस्ते २० मे १९१५ रोजी सारस्वत बोर्डिंगच्या इमारतीचे उद्घाटन झाले. राजर्षी शाहू महाराज यांच्या मदतीतून साकारलेल्या या वसतिगृहात आजही जात, धर्म आणि पंथविरहित गुणवत्तेनुसारच प्रवेश दिला जातो. फक्त वसतिगृह सुरू न ठेवता संस्थेच्या विकासामध्ये सारस्वत बांधवांचा सहभाग हवा, समाज एकत्र यावा, यादृष्टीने सन १९७५ मध्ये ‘सारस्वत विकास मंडळा’ची स्थापन करण्यात आली. मंडळाच्यावतीने गणेशोत्सव, हळदी-कुंकू, शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार, क्रीडा स्पर्धा, वधू-वर मेळावा व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कोल्हापुरातील शाहूकालीन वसतिगृहांमध्ये योजनाबद्ध आर्थिक नियोजन क्वचितच आढळते. सारस्वत बोर्डिंगच्या संस्थाचालकांनी त्यांना मिळालेल्या जागेत वेळोवेळी योजनाबद्धतेने इमारतीची वाढ केली आहे. त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून वसतिगृहातर्फे सामाजिक संस्थांना मदत केली जाते. त्यासह गरीब, हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. आतापर्यंत कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा येथील शेकडो विद्यार्थ्यांना वसतिगृहाने शिक्षण, नोकरीसाठी बळ दिले आहे. प्रतिकूल परिस्थितीतील, सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या या वसतिगृहाने शंभरी ओलांडली आहे. ‘शिक्षण व सेवा’ हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या सारस्वत समाजाने राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे काम अखंडपणे सुरू ठेवले आहे. संस्थेची विद्यमान कार्यकारिणी अध्यक्ष डॉ. यशस्विनी जनवाडकर, उपाध्यक्ष डॉ. गजानन आसगेकर, सचिव बाबा वाघापूरकर, विश्वस्त श्यामसुंदर घोलकर, सिद्धार्थ लाटकर, मोहन देशपांडे, किशोर सातोसकर, दिगंबर घोलकर, अॅड. धनंजय देशपांडे, सुधीर कुलकर्णी, सुमंगला पै, प्रसाद कामत. बिनव्याजी कर्ज समाजातील मुलांना उच्चशिक्षण मिळावे या उद्देशाने संस्थेच्यावतीने बिनव्याजी कर्जाच्या माध्यमातून मदतीचा हात दिला जातो. त्यातून अनेक मुले उच्चशिक्षण घेऊन विविध ठिकाणी कार्यरत आहेत. नोकरी लागल्यानंतर ते आपले कर्ज परत करतात. त्याचा लाभ समाजातील अनेक विद्यार्थ्यांनी घेतला आहे. समाजाचे प्रेरणास्रोत दिवंगत श्रीमंत आप्पासाहेब प्रभूइंगळीकर, रावबहाद्दुर रामचंद्र शिरगांवकर, प्रोफेसर व्ही. ए. देसाई, एन. यू. तेंगू, बाळकृष्ण तेंडुलकर, प्राचार्य अॅड. शंकरराव दाभोळकर, शां. कृ. पंत वालावलकर, तात्यासाहेब तेंडुलकर, डॉ. जे. पी. नाईक, के. डी. कामत, म. ग. लाटकर, आ. गो. कामत, जगन्नाथ हुकेरीकर, डॉ. कमलेश प्रभूू, व्यंकटेश भिकू पै, रामकृष्ण शानभाग, भाऊसाहेब साळगांवकर.
अग्रेसर गौड सारस्वत ब्राह्मण समाज
By admin | Updated: August 30, 2015 23:08 IST