कोल्हापूर : धारवाड (कर्नाटक) येथे माजी कुलगुरू डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची रविवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ रविवारी सायंकाळी बिंदू चौक येथे पुरोगामी धर्मनिरपेक्ष संघटनेच्यावतीने निषेध सभा घेण्यात आली. यावेळी विविध वक्त्यांनी निषेध व्यक्त करताना प्रतिगामी शक्तीविरोधात कोल्हापुरातून मोठा लढा उभा करावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. यावेळी ‘डॉ. कलबुर्गी अमर रहे’, ‘अभिव्यक्ती के खतरे उठाने होंगे’, अशा घोषणा दिल्या. निषेध सभेत बोलताना प्रा. उदय नारकर म्हणाले, गेल्या दोन वर्षांत पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकात पुरोगामी विचारांची प्रेरणा देणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे आणि आता डॉ. कलबुर्गी यांची हत्या प्रतिगामी शक्तींनी घडवून आणली आहे. त्यामुळे आता केवळ मेणबत्ती पेटवून प्रतीकात्मक निषेध नोंदवून चालणार नाही. याकरिता सप्टेंबर महिन्यापासूनच या धर्मांध शक्तींविरोधात लढा दिला पाहिजे. यावेळी प्रा. मेघा पानसरे यांनी निषेध व्यक्त करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सुरू आहे. आता अटीतटीचा लढा उभा करणे गरजेचे बनले असल्याचे मत मांडले. यावेळी भाकपचे चंद्रकांत यादव, जीवन बोडके, दिलीप पवार, गिरीष फोंडे यांनी निषेध व्यक्त केला. येत्या ६ सप्टेंबरला याच्या निषेधार्थ लाल निशाण पक्ष येथे डॉ. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती शंकर काटाळे यांनी दिली. यावेळी शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य अनिल घाटगे, अॅड. अरुण सोनाळकर, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, बाबा यादव, दिलीप पवार, नामदेव गावडे, कपिल मुळे, दिलावर मुजावर, सुशील लाड, विकास दाबाडे, राहुल जोखे, प्रशांत पिसे, अमोल देवडकर, अनिल चव्हाण, सुनीता अमृतसागर, प्रमोद म्हेत्रे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘रिंगण’ नाटकाला कागलमध्ये विरोध‘रिंगण’ या नाटकाचे राज्यभरात ३५० प्रयोग झाले आहेत. रविवारी कागल येथे या नाटकाचे प्रयोग करण्यासाठी ‘अंनिस’चे कार्यकर्ते गेले असता येथे जमाव बंदीच्या कारणावरून प्रयोग करू दिले नाहीत, अशी माहिती यादरम्यान मेघा पानसरे यांनी दिली. त्यांनी त्याचा निषेध केला.
प्रतिगामी शक्तींविरोधात कोल्हापुरातून ठिणगी पेटवू
By admin | Updated: August 30, 2015 23:42 IST