इचलकरंजी : कृष्णा व पंचगंगा या दोन्ही पाणी उपसा योजनेचे मिळून जवळपास ७१ लाखांचे वीजबिल नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून थकले आहे. वीजबिल न भरल्यास शहरातील पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार असल्याने पालिका पदाधिकारी व प्रशासनाची रकमेसाठी धावपळ सुरू आहे.
शहरासाठी दररोज कृष्णा योजनेतून ४० एमएलडी, तर पंचगंगा योजनेतून ९ एमएलडी पाणी उपसा होतो. त्याचे दरमहा अंदाजे अनुक्रमे ३२ लाख व १२ लाख वीजबिल येते. परंतु पालिकेने गेल्या महिन्याचे वीजबिल भरले नसल्याने ७१ लाखांपर्यंत थकबाकी पोहोचली आहे. यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पालिकेच्या संबंधित विभागास सूचना दिल्याचे समजते. सध्या पालिकेची आर्थिक परिस्थिती खूपच गंभीर असल्याने कर्मचाऱ्यांचा पगार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन यासह अन्य देणी भागविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उपसा केंद्राचे वीजबिल थकित असल्याने संबंधित अधिकारी हैराण झाले आहेत. तसेच नागरिकांकडून कर स्वरूपात जमा होणाऱ्या पैशाचे प्रमाण कमी झाल्याने थकित रक्कम जमा करताना पालिकेच्या नाकीनऊ येत आहे.