सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यास यावर्षी गळितास येणाऱ्या उसाला एफआरपीप्रमाणे प्रतिटन २५८५ रुपये एकरकमी देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केली.बिद्री कारखाना कार्यस्थळावर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पातून निर्माण झालेली एक कोटी युनिट वीज निर्यात व उत्पादित दोन लाख साखर पोत्यांचे पूजन, अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते साखर पोत्यांचे पूजन, तर एक कोटी वीज विक्री केली त्याबद्दल वीज निर्यात पॅनेलचे पूजन उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्ष पाटील म्हणाले, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेची उपलब्धता जादा असल्याने दिवसेंदिवस साखरेचे भाव कमी होत आहेत. केंद्र सरकारकडून बफर स्टॉक ठेवणे, निर्यातीसाठी अनुदान देणे अथवा विशेष अनुदान यासारखे उपाय योजले जातील. या प्रतीक्षेत सर्व कारखानदार आहेत. मात्र, त्यावर काही हालचाली होताना दिसत नाहीत. आपल्या सहवीज प्रकल्पाच्या उत्पादनातून ऊसदर देण्यासाठी काही प्रमाणात मदत होणार आहे. कारखाना यावर्षी गळितास आलेल्या उसाला प्रतिटन २५८५ रुपये दर जाहीर करीत असून, पहिल्या पंधरावड्यास गाळपास आलेल्या उसाचे बिल ऊस पुरवठादारांच्या बॅँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाची मदत, सवलती व साखरेचे दर वाढल्यास यापुढेही आर्थिक वाढावा देण्यास बिद्री कारखाना कटिबद्ध राहील.यावेळी उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, संचालक के. डी. नांदेकर, नामदेवराव भोईटे, ए. वाय. पाटील, गणपतराव फराकटे, विजयसिंह मोरे, वसंतराव पाटील, दत्तात्रय खराडे, पंडितराव केणे, विलासराव झोरे, धनाजीराव देसाई, सविता एकल, कमल चौगले, कार्यकारी संचालक आर. डी. देसाई, आदी उपस्थित होते.
‘बिद्री’कडून २५८५ दर
By admin | Updated: December 19, 2014 23:51 IST