लोकमत न्यूज नेटवर्क खोची:हातकणंगले तालुक्यातील वारणा नदीकाठच्या भेंडवडे, खोची गावात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांत प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. कालच्या रात्रीत अनपेक्षितपणे पाण्याची पातळी वाढून पुराच्या पाण्याचा गतीने गावात शिरकाव झाला.भेंडवडे गावाचा गावभाग पाण्यात गेला असून सकाळपासूनच नागरिकांनी घराबाहेर पडत सुरक्षित स्थळी निवारा शोधला.भेंडवडे गावातील सुमारे ३०७ कुटुंबातील १६१५ लोकांना नरंदे येथील नरंदे हायस्कूलच्या इमारतीत तसेच मित्र,नातेवाईक यांच्या घरामध्ये स्थलांतरित करण्यात आले. खोची येथील ११२ कुटुंबातील ५१० लोकांना स्थलांतरित करण्यात आले. मराठी शाळेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही गावातील चारशे जनावरे स्थलांतरित केली आहेत. भेंडवडे येथे दोन घरांची पडझड झाली आहे.
दरम्यान, आमदार राजू आवळे यांनी वरील दोन्ही गावांना तातडीने भेट दिली. भेंडवडे येथील परिस्थिती गंभीर बनली असल्याने त्यांनी थेट पुराच्या कमरेएवढ्या पाण्यातून चालत जाऊन मध्यभागी पोहोचून परिसरात वाढत चाललेल्या पाण्याची पाहणी केली. बोटीची पाहणी करून लोकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यासंदर्भात जीवनज्योती रेस्क्यू फोर्सच्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या. पूरग्रस्त लोकांची विचारपूस करून त्यांना धीर दिला. प्रशासकीय यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना देऊन स्थलांतरित लोकांना सुविधा पुरविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
त्यांच्यासोबत राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने, सरपंच काकासो चव्हाण, उपसरपंच डॉ. संजय देसाई, पोपट माने, वडगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, सुहास देसाई, संजय कांबळे, दिलीप कांबळे, तलाठी सुरेश खोत, कोतवाल नितीन कोळी उपस्थित होते. ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी सरपंच जगदीश पाटील, सुशेनराव शिंदे,प्रमोद सूर्यवंशी, धनाजी पवार, शंकर जांभळे, ग्रामविकास अधिकारी मगदूम उपस्थित होते.
२३ खोची पूर भेट
फोटो ओळी-भेंडवडे येथे वारणा नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यात जाऊन आमदार राजू आवळे यांनी पाहणी करून थेट मदतकार्य केले.यावेळी सर्जेराव माने, सचिन चव्हाण, सुहास देसाई, सुरेश खोत उपस्थित होते.