कोल्हापूर : कोरोनाचा उद्रेक कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनामार्फत ‘संजीवनी अभियान’ प्रभावीपणे राबविले जात असून, मागच्या पंधरा दिवसांत १९ हजार १५६ व्याधीग्रस्त नागरिकांची या अभियानातून तपासणी केली. त्यातून ६०५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ‘ब्रेक द चेन’साठी हे अभियान महत्त्वाचे ठरत आहे.
वेळीच कोरोना रुग्णाचे निदान होत असल्याने त्यांच्यापासून इतरांना होणारा संसर्ग यामुळे रोखण्यात यश येत आहे. तसेच संबंधित रुग्णाला वेळेवर उपचार मिळत असल्याने मृत्यूदर कमी करण्यामध्येही हा अभियान महत्वाची भूमिका बजावत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रुग्ण आणि मृत्यूदर वाढल्याने प्रशासनासमोर एक चिंतेची बाब होती. व्याधीग्रस्त रुग्ण कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले होते. टास्क फोर्सने महापालिका प्रशासनाला कोरोना रुग्णांचे वेळीच निदान आणि वेळेवर उपचार झाल्यास मृत्यूदर कमी करणे शक्य असल्याच्या सूचना केल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने अभिनव असे ‘संजीवनी अभियान’ सुरू केले.
दि. १६ मे पासून अभियान सुरू आहे. यामध्ये व्याधीग्रस्त लोकांची तपासणी केली जाते. सहा मिनिटांची वॉकटेस्ट घेऊन ऑक्सिजन लेवल तपासली जाते. यामध्ये कोरोना संशयित रुग्णांची तात्काळ कोरोना तपासणी केली जाते. शहरात दि. १६ ते ३१ मे दरम्यान या अभियानाअंतर्गत ६५ हजार ४९६ नागरतकांची तपासणी केली. ७२६९ व्याधीग्रस्त नागरिकांची ॲन्टिजन टेस्ट केली. यामध्ये ३१४ व्याधीग्रस्त पॉझिटिव्ह आढळून आले. तसेच ११ हजार ८८७ नागरिकांची आरटीपीसीआर करण्यात आली. यामध्ये २९१ नागरिक पॉझिटिव्ह आले.
कोट
व्याधीग्रस्त व गंभीर आजारी असणाऱ्या व्यक्तींना या कोरोना संसर्गाचा धोका अधिक असल्याने अशा व्यक्तींच्या घरी भेटी देऊन महापालिकेचे कर्मचारी त्यांची सहा मिनीट वॉकटेस्ट घेत आहेत. वॉक टेस्टच्या निष्कर्षावर संबंधितांची कोविड टेस्ट केली जाते. यामुळे कोरोना रुग्णांचे निदान लवकरात लवकर होऊन त्यांच्यावर उपचार करणे सोपे झाले आहे.
डॉ. कादंबरी बलकवडे, प्रशासक