कोल्हापूर : बियाणे व खतांच्या उपलब्धतेबरोबरच वाढीव दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर, कृषी विभागाने स्थापन केलेल्या १४ भरारी पथकांनी पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील १८६ कृषी सेवा केंद्रांना चांगलाच हिसका दाखवला. रजिस्टर तपासणीसह प्रत्यक्ष साठा देखील जाऊन तपासला गेल्याने कृषी सेवा केंद्राचे धाबेच दणाणले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्या नेतृत्वाखाली या पथकांनी झाडाझडती करत १८ दुकानांची आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेतली. आता त्यांच्यावर आज, सोमवार आणि उद्या, मंगळवारी सुनावणी ठेवण्यात आली असून खुलासा आल्यानंतर कारवाईची प्रक्रिया सुरू होणार आहे.
माॅन्सून तोंडावर आल्याने शेतकऱ्यांकडून बियाणे व खतांची मागणी वाढली आहे, पण उपलब्धता नसल्याचे सांगत अडवणूक होत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाच्या हेल्पलाईनवर आल्या होत्या. त्याची तातडीने दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी शनिवारी १४ पथके स्थापन केली. प्रत्येक पथकात तीन अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला.
रविवारी लगेच या पथकांना सकाळी आठ वाजता प्रत्येक तालुक्यातील दहा ते १५ केंद्रे याप्रमाणे तपासणीचे आदेश काढले. त्यानुसार सकाळी ही पथके दुपारी दोनपर्यंत जिल्ह्यात फिरत राहिली. जादा दराने विक्री केल्याच्या तक्रारीत तथ्य आढळले. जादा दराने विकून कमी दराची पावती केल्याचीही उदाहरणे आढळली. साठा पुस्तक देखील अद्यावत ठेवले नसल्याचे आढळून आले. रेकॉर्ड तपासणीमध्ये बऱ्याच त्रुटी आढळल्या आहेत. पथकाने साठा देखील तपासला. शिवाय ज्यांनी बियाणे व खते खरेदी केली आहेत, त्यांच्याकडेही दराच्या बाबतीत चौकशी केली.
शेतकऱ्यांना दिलासा
अजूनही मागणीच्या तुलनेत बियाण्यांची उपलब्धता कमी आहे. जे आहे ते देखील वाढीव दराने विकले जात असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे येत होत्या. तसेच, या काळात खतांचीही मागणी जास्त असते, पण वाढीव मागणी व खतांच्या दरातील धोरणांचा गैरफायदा उठवत कृषी सेवा केंद्र चालकांकडून वाढीव दराने खतांची विक्री सुरु असल्याच्याही तक्रारी आल्यानंतर कृषी विभागाने तातडीने पाऊले उचलत त्यांना कारवाईचा दम दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
फोटो: ३००५२०२१-कोल-कृषी ०१, ०२, ०३
फोटो ओळ: कृषी विभागाच्या भरारी पथकांनी रविवारी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्राची अचानक तपासणी करुन साठ्यासह रेकॉर्डची तपासणी केली.