लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी येत नसून ती दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. सोमवारी संध्याकाळी संपलेल्या ४८ तासांमध्ये जिल्ह्यात नवे १८४ रुग्ण आढळले असून, यातील सर्वाधिक रुग्ण नेहमीप्रमाणे महापालिका क्षेत्रातील आहेत. ही संख्या ९९ इतकी आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराकडे प्रशासन नियम अधिक कडक करण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांत आजरा तालुक्यात चार, भुदरगड तीन, गडहिंग्लज तीन, हातकणंगले अकरा, करवीर वीस, पन्हाळा चार, शाहूवाडी एक, शिरोळ एक, नगरपालिका क्षेत्रामध्ये सोळा आणि इतर जिल्ह्यांतील २१ अशा नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दोन दिवसांमध्ये ४६४ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, १९०५ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. २४३ जणांची अँटिजन टेस्ट करण्यात आली असून, सध्या ७७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दोन दिवसांमध्ये १२३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
येलूर, जि. सांगली येथील ४९ वर्षीय महिलेचा, इचलकरंजी येथील आवळे गल्लीतील ७४ वर्षांच्या पुरुषाचा तर प्रतिभानगरमधील एसबीआय काॅलनीतील ७५ वर्षांच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेले काही दिवस रोज सरासरी ७५ हून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. सोमवारी, मंगळवारी तर हा आकडा ९० च्यावर गेल्याने काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे.
चौकट
पुण्या-मुंबईकडून येणाऱ्यांचे काय?
मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा जर या दोन्ही शहरांतून नागरिक मोठ्या संख्येने गावाकडे येऊ लागले तर याबाबत प्रशासनाची भूमिका काय राहणार, याकडेही नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
चौकट
आज अधिकाऱ्यांची बैठक शक्य
तीन दिवसांच्या सुटीनंतर जिल्हा स्तरावरील सर्व शासकीय कार्यालये आज मंगळवारी पुन्हा सुरू होणार आहेत. मार्चअखेरीमुळे जरी काही कार्यालये सुरू असली तरी त्यामध्ये आर्थिक विषयासाठी ती कार्यरत होती. मात्र, राज्यातील वाढती संख्या, राज्यस्तरावरून दिले जाणारे लाॅकडाऊनचे संकेत यामुळे मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.