सांगली : मुंबईतील सराफ व्यावसायिक राकेश महेंद्र जैन यांचे त्यांच्या रत्नागिरी ते मुंबई प्रवासात लंपास झालेले सुमारे १०५ तोळे सोन्याचे दागिने (एक किलो) जप्त करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला रविवारी सकाळी यश आले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. विलास रामदास पवार (वय २६, रा. सरपडोह, ता. माढा, जि. सोलापूर) व हिरामण सर्जेराव डिकोळे (३७, वडशिंगे, ता. माढा, जि. सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही सराफ कट्ट्यावर दागिने विकायला आले असता सापडले. सांगलीतील सराफ कट्ट्यावर दोन संशयित तरुण आलिशान मोटारीतून दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांना मिळाली होती. गेल्या चार दिवसांपासून घनवट यांच्यासह सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, पोलीस शिपाई बिरोबा नरळे, कुलदीप कांबळे, संदीप गुरव यांचे पथक सराफ कट्ट्यावर तळ ठोकून होते. रविवारी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार, काळ्या रंगाच्या एका आलिशान मोटारीतून दोन तरुण उतरले. त्यांच्या हातात बॅग होती. त्यांना लगेचच ताब्यात घेण्यात आले. बॅगेची झडती घेण्यात आली असता, १०५ तोळे सोने, २२ हजाराची रोकड बॅगेत सापडली. या दोघांकडे चौकशी केल्यानंतर त्यांची नावे विलास पवार व हिरामण डिकोळे असल्याचे निष्पन्न झाले. आठवड्यापूर्वी मुंबईतील सराफ व्यावसायिक राकेश जैन हे प्रवास करीत असताना हे दागिने आपण चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दागिने, रोकड व मोटार असा ३३ लाख १५ हजार २८४ रुपयांचा माल जप्त केला आहे.राकेश जैन व्यवसायानिमित्त राज्यातील अनेक मोठ्या शहरात फिरतात. २२ आॅगस्टला ते विविध प्रकारचे १०५ तोळे सोन्याचे दागिने घेऊन रत्नागिरीला आले होते. त्याची किंमत सुमारे २७ लाख रुपये होती. दागिने त्यांनी बॅगेत ठेवले होते. रत्नागिरीतील काम आटोपल्यानंतर ते खासगी आराम बसने मुंबईला निघाले होते. बसमध्ये त्यांना झोप लागली होती. संगमेश्वर (जि. रत्नागिरी) येथे बस थांबल्यानंतर त्यांना जाग आली. त्यावेळी त्यांच्या सीटजवळ असलेली दागिन्यांची बॅग नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बसमधील सर्व प्रवाशांकडे चौकशी केली. तथापि, बॅगेबाबत कोणाला काहीच माहिती नव्हते. चोरट्यांनी बॅग लंपास केल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. (प्रतिनिधी)चार टोळ्या जेरबंद : सुनील फुलारीजिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले की, गेल्या महिन्यात चोरी, वाटमारी, घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे करणाऱ्या चार टोळ्या सापडल्या आहेत. या टोळ्यांकडून अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. मुंबईच्या सराफ व्यावसायिकाचे दागिने लंपास करणाऱ्या या संशयितांविरुद्ध राज्यातील पोलीस ठाण्यात कुठे गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत. या सराफाचे जेवढे दागिने गेले होते, त्यापेक्षा दहा तोळे जास्त दागिने जप्त केले आहे. आणखी चौकशी केली जात आहे.
सांगलीत १०५ तोळे सोन्याचे दागिने जप्त
By admin | Updated: August 30, 2015 23:40 IST