- सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी लोक अदालतच्या माध्यमातून शनिवारी १३ सप्टेंबर रोजी एकदिवसीय अभययोजना लागू केली. या योजनेत मालमता कराची एकत्रित रक्कम भरल्यास त्यावरील शंभर टक्के व्याज माफ होणार असल्याची माहिती मालमत्ता कर विभागाच्या सहाय्यक आयुक्त मयुरी कदम यांनी दिली.
उल्हासनगर महापालिका मालमत्ता कर विभागाची थकबाकी ५०० कोटी पेक्षा जास्त असून गेल्या वर्षी १२६ कोटीची विक्रमी मालमत्ता कराची वसूली झाली होती. यावर्षीही विक्रमी मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे आग्रही आहेत. यावर्षी ऑगस्ट महिन्यात मालमत्ता कराची एकत्रित रक्कम भरल्यास त्यावर ५ टक्के सूट अशी अभययोजना आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विशाखा मोटघरे, कर निर्धारक व संकलक मयुरी कदम, उपकर निर्धारक व संकलक नितेश रंगारी यांनी राबविण्यात येत आहे. या योजनेतून आतापर्यंत विभागाची १७ कोटीची वसूली झाली असून नागरिकांचा प्रतिसाद बघता महापालिकेने ५ टक्के सुटीच्या या योजनेला ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली.
महापालिका मालमत्ता कर एकरक्कमी भरल्यास त्यावर ५ टक्के सुटीची अभययोजनेला एकीकडे सुरू असताना, दुसरीकडे शनिवारी १३ तारखेला एकदिवसीय अभययोजना जाहीर केली. मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ उठविण्याची मागणी केली. या योजनेतून किती वसुली होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.