ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - काही वर्षांपूर्वी वंदेमातरम् या राष्ट्रगीता वरून वाद निर्माण झाला होता. परंतू आता त्याच धरती वर जयहिंद या सोपस्काराला घेऊन वाद झाला आहे. भारतीय लष्करातील इशरत अली या मौलवीने जयहिंद बोलण्यास नकार दिला असून, तो हिंदू धर्माचा जयघोष असल्याचे म्हटले आहे. या कारणावरून वाद वाढला असून अली यांना त्यांच्या वरीष्ठअधिका-यांनी नोटीस बजावली आहे. त्या नोटीसमध्ये त्यांना आपले संकुचित विचार बदलून सर्व व्यापक दृष्टीकोनातून विचार करावा असं सांगण्यात आले आहे. तसेच रामराम आणि जयमातादी बोलावे असे बजावले आहे.
जयहिंद हा सोपस्कार नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील अबिद हसन जाफरानी यांनी प्रचलित केला होता, तसेच त्याचा अर्थ भारत चिरायु होवो असा होतो असे लष्कराकडून सांगण्यात येत आहे. भारतीय लष्कर हे १०० टक्के निपक्षपाती आणि सर्वधर्म समभाव करते असं मेजर जनरल शौकीन चौहान यांनी म्हटले आहे. तसेच अली यांचे वरीष्ठ अधिकारी चित्रा सेन यांना याप्रकरणी विचारले असता त्यांनी या प्रकरणी भाष्यकरण्यास नकार दिला आहे. याबाबत आर्मी हेडक्वार्टर काय ते बोलेल असं कर्नल सेन यांनी सांगितले आहे. बीएसएफ मधील माजी असिस्टंट कमांडंट आणि वकील राजीव आनंद यांनी या प्रकरणी असे म्हटले की जयहिंद ही घोषणा सैनिकांना एकीची भावना व देशप्रेम जागृत करण्याकरता देण्यात येते. तिचा सर्व सैनिकांनी आदर करायला हवा.
इशरत अली गेली २२ वर्षे भारतीय लष्करात मौलवी म्हणून काम करत आहेत परंतू गेल्या मे महिन्यापासून त्यांना लक्ष्य केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी इशरत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मी अनेक अधिकारी बघितले आहेत. अगदी व्ही.के सिंग साहेबांसोबतही माझा संबंध आला आहे. त्यांना मी जयहिंद न बोलण्यावर काहीच आक्षेप नव्हता. तसेच जयहिंद बोललो नाही तर मी देशभक्त नाही असं कसं ठरवता येईल? दिल्लीच्या रजपूतना रायफल मध्ये मी १० वर्ष काम केले आहे. माझ्या एका कनिष्ठ सहका-याला सुदानला पाठवावे म्हणून मी विनंती केली होती. परंतू त्याच्या ऐवजी मलाच सुदानला पाठवण्यात आले तसेच तिथुन आल्यावर माझी तात्काळ बिकानेरला बदली करण्यात आली. मी या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली असून मला दिल्लीतच बदली मिळावी अशी विनंती केली आहे. बिकानेरची बदली नाकारण्यामागे मुख्य कारण म्हणजे माझी पत्नी हृदयविकाराने त्रस्त आहे, तसेच माझ्या मुलांचे शिक्षण सुरु आहे असे अली यांनी सांगितले आहे. अली यांनी दाखल केलेली तक्रार दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच अली यांनी त्यांच्या वागणुकीच्या वार्षिक अहवालावर सही करण्यास नकार दिला आहे. तसेच त्यांना जहिंद घोषणेच्या वादावरून दुस-यांदा नोटीस बजावण्यात आली आहे.