लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सोमवारी सकाळी सात वाजता धरणाचे १६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीला पूर आला असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यंदा प्रथमच धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले असून पुढील २४ तासात पाण्याचा प्रवाह आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हतनूर धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस होत आहे. त्यात रविवारी संध्याकाळीदेखील चांगला पाऊस झाला. यात सरासरी ३६.८ मि.मी. पाऊस झाला असला तरी यात एकट्या चिखलदरा येथे १०३ मि.मी. पाऊस झाल्याने पावसाचे हे पाणी पूर्णा नदीद्वारे धरणात पोहचत आहे. यात रविवारी मध्यरात्रीपासूनच धरणात पाण्याची आवक वाढली असून पाटबंधारे विभागाचे अधिकारी धरणावर लक्ष ठेवून आहेत.
यामध्ये १२ जुलै रोजी सकाळी सात वाजता धरणाचे १६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले. तापी नदीपात्रात ४५ हजार ८०३ क्युसेक पाणी सोडण्यात आले. पुढील २४ तासात पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाच्या खालील गावात नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये गुरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये, असे आवाहन पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.