लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर दिल्याने रोजगारनिर्मिती होऊन तरुणांच्या हाताला काम मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून व्यापार क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे, ज्येष्ठांना प्राप्तीकर परताव्यापासून सुटका झाल्याने दिलासा मिळाला आहे. तर कररचनेत कोणताही बदल न झाल्याने नोकरदारांना दिलासा मिळाला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी अर्थसंकल्प मांडताना त्यात विविध क्षेत्रांबाबत घोषणा केल्या. पायाभूत सुविधांवर भर दिल्याने सर्वच क्षेत्रांत भरभराट येणार असून याचा सर्वच क्षेत्राला लाभ होणार असल्याच्या विश्वास व्यक्त केला जात आहे.
यासोबतच सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या इंधनावरील सीमा शुल्क कमी केले. मात्र तेवढाच कृषी कर वाढविल्याने दर वाढणार नाही की कमी होणार नसल्याचे चित्र आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात कोणताही कर वाढला नसून इंधन दरवाढ होण्याचेही संकेत नाहीत. त्यामुळे महागाई वाढेल, याची चिंता सध्यातरी नसल्याने तेवढा दिलासा आहे.
- मेघा जाधव गृहिणी
आता प्रत्येक घटकावर आयात शुल्क लावण्यात आल्याने किराणा व्यवसायावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे याची स्पष्टता होत नाही, तोपर्यंत चिंता राहणार आहे. व्यापार क्षेत्रासाठी तरदूद हवी होती.
- श्याम वाणी, किराणा दुकानदार
या अर्थसंकल्पात कररचनेच कोणताही बदल झालेला नाही. एकतर करवाढीची चिंता होती. आधीच कोरोनाकाळातील झळा कायम आहे. करवाढ नसल्याने दिलासा आहे.
- दिलीप बारी, खासगी नोकरदार
या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर देण्यात आल्याने रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे अनेकांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. - नीलेश चौधरी, युवक
अर्थसंकल्प समाधानकारक नाही. व्यापाऱ्यांसाठी अपेक्षित घोषणांचा यात समावेश नाही. ज्या सवलती हव्या होत्या, त्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे निराशा झाली आहे.
- विजय काबरा, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महामंडळ.
यंदाच्या अर्थसंकल्पात करवाढ नाही. तसेच इंधनावरील आयात शुल्क कमी केले मात्र त्यात कर लावल्याने इंधनाचे भाव तसेच राहणार आहेत. कोरोनानंतर व्यवसायासाठी काही घोषणाची अपेक्षा होती.
- जितेंद्र पाटील, ऑटोचालक
कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा झाल्या असून त्यामुळे शेतीला व पर्यायाने शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ होईल. यामुळे उत्पादन वाढून भाजीपालाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. - योगेश महाजन, भाजीपाला विक्रेता
शेतीमालाला दीडपट हमीभावाची घोषणा केवळ मृगजळ आहे. यासाठी पैसा कसा येणार, याची काही तरतूद नाही. शेतकऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प निराशाजनकच आहे. आंदोलनाबाबत दखलही नाही.
- किशोर चौधरी, शेतकरी
इंधनावर सीमा शुल्क कमी केले खरे, मात्र त्यावर कृषीकर तेवढाच वाढला. त्यामुळे इंधनाचे दर कमी होणार नाही की वाढणार नाही. याचा सर्वसामान्यांवर परिणाम होणार नाही.
-प्रकाश चौबे, पेट्रोलपंपचालक
यंदाच्या अर्थसंकल्पात ज्येष्ठांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्राप्तीकर विवरणपत्र सादर करण्यापासून सुटका झाल्याने सर्व ज्येष्ठांसाठी हा चांगला निर्णय म्हणता येईल.
- रामराव पाटील, ज्येष्ठ नागरिक
बजेटवर कुठे काय चर्चा
बसस्थानक
यंदाचा समाधानकारण अर्थसंकल्प असून घोषित करण्यात आलेल्या घोषणांमुळे फायदा होईल अशी चर्चा बसस्थानकावर सुरू असताना याच ठिकाणी काही जणांची कररचनेवर चर्चा सुरू होती. अनेकांनी प्राप्तीकरात बदल नसल्याबद्दल समाधान व्यक्त केले तर शेतीसाठी केवळ घोषणा असून शेतकरी आंदोलनावर काही तोडगा नसल्याने नाराजीही व्यक्त केली.
रेल्वेस्थानक
भुसावळ विभागातून एकही नवीन रेल्वेगाडी नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पाचा आपल्या विभागाला काहीही लाभ होणार नाही, अशी चर्चा रेल्वेस्थानकात प्रवाशांमध्ये सुरू होती. तसेच रेल्वेसाठी सुविधा मिळतील याचीही घोषणा नसल्याने सरकारने केवळ तोंडाला पाने पुसल्याचा सूर होता.