जळगाव : चाळीसगाव येथून लग्न आटोपून जळगावला घरी परत येत असतांना दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रस्त्यात उभ्या ट्रॅक्टरवर चारचाकी धडकली. त्यात मनपाच्या नगरसेविका जयश्री देशमुख यांचा मुलगा अजय गजानन देशमुख (वय २७) याच्यासह स्वप्निल चंद्रकांत पाटील (वय २७),निखिल अशोक पाटील व राहुल अशोक पाटील (वय २३, सर्व रा. मुक्ताई कॉलनी, जळगाव) हे चार जण जखमी झाले. एअरबॅगमुळे चौघांचा जीव वाचला. हा अपघात मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जळगाव पाचोरा रोडवरील हडसन गावाजवळ झाला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताई कॉलनीतील चाळीसगाव येथे विवाह सोहळा होता. या लग्नासाठी कॉलनीतील स्वप्निल पाटील यांच्या कारने (एम.एच.१९ सी.व्ही) स्वप्निलसह अजय देशमुख , निखिल पाटील व राहुल पाटील हे चौघे जळगाव-पाचोरा मार्गे गेले होते. लग्न सोहळा पार पडल्यानंतर चौघेही कारने पुन्हा जळगावकडे परतत होते. यादरम्यान, हडसन गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला कारने जोरदार धडक दिली.
कारचा चुराडा
अपघात इतका जोरदार होता की यात कारचा समोरील संपूर्ण भाग चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर कारमधील एअरबॅग उघडली. यानंतर गाडीतील स्वप्निल याने त्याच्यासोबतच्या इतरांना कारबाहेर काढले. तसेच मोबाईलवर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावली तसेच अपघाताची माहिती कुटुंबीयांना दिली. रुग्णवाहिकेने चौघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यात अजय देशमुख व राहुल पाटील या दोघे गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.