नंदुरबार : शेतकर्यांना कृषिपंपांसाठी वीज जोडणी देण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे पैसे भरूनही तब्बल तीन हजार शेतकरी विजेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शेतात पाण्याची सुविधा असूनही बागायती शेती होऊ शकत नसल्याने शेतकर्यांची प्रगती खुंटली आहे. शासनातर्फे शेती आणि शेतकर्यांच्या विकासाच्या गप्पा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात मात्र प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे शेतकर्यांपर्यंत योजना पोहोचत नसल्याचे चित्र आहे. त्याचाच एक भाग म्हणजे जिल्ह्यातील तब्बल दोन हजार ९४८ शेतकरी अजूनही कृषिपंपासाठी लागणार्या विजेच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे या शेतकर्यांनी डिमांडसाठी तब्बल तीन वर्षांपासून रक्कम भरूनही त्यांना वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात फेर्या माराव्या लागत आहेत. जिल्ह्यातील चित्र पाहिल्यास यावर्षी चार हजार ५२६ कृषिपंपांना वीज देण्याचे लक्ष्य ठरविले होते. प्रत्यक्षात मात्र केवळ एक हजार ५७८ शेतकर्यांना वीज जोडणी मिळाली आहे. तालुकानिहाय चित्र पाहिल्यास नंदुरबार आणि नवापूर तालुक्यातील वीज जोडणी न मिळालेल्या शेतकर्यांची संख्या मोठी आहे. नंदुरबार तालुक्यातील एक हजार ३६७ शेतकर्यांना वीज जोडणी मिळालेली नाही. तर नवापूर तालुक्यातील ९३५ शेतकर्यांना, शहादा तालुक्यातील २८४, अक्कलकुवा तालुक्यातील २१६, धडगाव तालुक्यात ४८ आणि तळोदा तालुक्यातील ३८ शेतकर्यांना पैसे भरूनही वीज जोडणी मिळालेली नाही. वीज नसल्याने शेतात पाण्याची सुविधा असतानाही बागायती पिकांची लागवड शेतकरी करू शकत नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या प्रगतीत प्रशासनाचे आडमुठे धोरण अडचणीचे ठरत असल्याचे चित्र आहे.
तीन हजार शेतकर्यांना विजेची प्रतीक्षा
By admin | Updated: May 21, 2014 01:12 IST