जळगाव : मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी २९ मेपासून मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. नव मतदार तसेच ज्या मतदारांची नावे लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत, त्यांनी नव्याने नाव नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी केले आहे. मतमोजणीची प्रक्रिया आटोपल्यानंतर शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पत्रपरिषद घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, निवडणूक उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने उपस्थित होते. जिल्हाधिकारी अग्रवाल म्हणाल्या, जनता, अधिकारी आणि कर्मचार्यांच्या सहकार्यामुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत व वेळेत पूर्ण झाली. आता २९ मे पासून मतदार नोंदणीची निरंतर प्रक्रिया सुरू होणार आहे. मतदार नोंदणी अधिकार्यांकडून ही प्रक्रिया अचूक व जलदगतीने राबविली जाईल. त्यासाठी तहसील व प्रांत कार्यालयात व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्या मतदारांची नावे लोकसभा निवडणुकीपूर्वी वगळण्यात आली, ते मतदार सुद्धा आवश्यक कागदपत्रांसह नव्याने अर्ज करू शकतात. सर्व अर्जांची छाननी ३० दिवसाच्या आत करून निर्णय घेण्यात येईल. निवडणुकीच्या कामकाज दरम्यान अव्वल कारकून प्रवीण पाटील व मनपाचा शिपाई राजू ठाकूर यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
२९ मे पासून मतदार नोंदणी
By admin | Updated: May 18, 2014 01:32 IST