जामनेर, जि.जळगाव : तालुक्यातील सुमारे साडेनऊ हजार शिधापत्रिकाधारकांचे अंगठे आॅनलाइन संगणक प्रणालीत जुळत नसल्याने त्या कुटुंबाना धान्यापासून वंचित राहावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे. दुकानदार व पुरवठा विभागाचे दुर्लक्ष याला कारणीभूत ठरत असल्याचा आरोप होत आहे. मंगळवारी ढालगाव, ता.जामनेर येथील सुमारे १०० शिधापत्रिकाधारकांनी केलेल्या तक्रारींमुळे हा प्रकार समोर आला आहे.ढालगाव येथील इकबाल तडवी, खलील तडवी, इस्माईल तडवी, सबनूरबी तडवी, दिलीप तडवी, बशीर तडवी, शरीफ तडवी, बाबू तडवी यांच्यासह ग्रामस्थांनी पुरवठा विभागात येऊन अंगठे जुळत नसल्याने धान्य मिळत नसल्याची तक्रार केली. पुरवठा निरीक्षक विठ्ठल काकडे यांनी तातडीने दुकानदार राजाराम सोनवणे याना बोलविले. ज्यांचे अंगठे जुळत नाही त्यांची कागदपत्रे घेऊन अमळनेरला जाण्याचे सांगितले.दरम्यान, ढालगाव येथील काही श्रीमंतांनी आपली नावे अंत्योदय व प्राधान्य योजनेत समाविष्ट केल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. याबाबत पुराव्यानिशी तक्रार देण्याचे निरीक्षकांनी सांगितले.यापूर्वी शेंदुर्णी व कुंभारी बुद्रूक येथील नागरिकांनी पुरवठा विभागाकडे अंगठे जुळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र पुरवठा विभागाने त्याची दखल न घेतल्याने विविध गावातून तक्रारी येत आहेत. दुकानदार व पुरवठा विभागाने याबाबत कार्यवाही करणे गरजेचे आहे. संगणकीय प्रणालीत या संबंधीचे काम अमळनेर येथे केले जात असल्याची माहिती मिळाली.
ढालगावचे ग्रामस्थ धडकले जामनेर तहसीलवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 16:15 IST
जामनेर तालुक्यातील सुमारे साडेनऊ हजार शिधापत्रिकाधारकांचे अंगठे आॅनलाइन संगणक प्रणालीत जुळत नसल्याने त्या कुटुंबाना धान्यापासून वंचित राहावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे.
ढालगावचे ग्रामस्थ धडकले जामनेर तहसीलवर
ठळक मुद्देअंगठे जुळत नसल्याने धान्यापासून वंचितशिधापत्रिकाधारकांनी केलेल्या तक्रारींमुळे प्रकार उघडकीस