भुसावळ : जिल्हा निर्मितीकडे वाटचाल करणाऱ्या भुसावळ शहरातील लोकसंख्येच्या मानाने पाहिजे तितका कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा उपलब्ध होत नाही, लोकसंख्येच्या तुलनेत जास्तीचा लसीचा साठा उपलब्ध व्हावा जेणेकरून लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही. याशिवाय आलेल्या लसी हे प्रत्येक केंद्रावर समसमान वाटल्या गेल्यास केंद्रावर गर्दी होणार नाही. असे नियोजन झाल्यास कोरोनाचा धोकाही कमी होईल. आजपर्यंत शहरी भागात पहिला व दुसरा डोस ४५ हजार ३९९, तर ग्रामीण भागात ११ हजार ४३ नागरिकांनी घेतला आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात लसीकरण कमी झाले आहे.
कोरोनाची दुसरी लाट भयावह ठरत आहे. यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले याची धास्ती घेत सुरुवातीला या लसीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांनी नंतर लसीकरण केंद्रावर रांगा लावल्या. लस आल्यानंतर अवघ्या काही तासातच केंद्रावरून लसींचा साठा संपून जात आहे. इतकी धास्ती सध्या नागरिकांनी घेतल्याचे दिसून येत आहे
पहाटे पाचपासून लागतात रांगा
कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी लस हेच एकमेव शस्त्र आहे, याकडे आता नागरिक गांभीर्याने विचार करून लस घेण्यासाठी वाढताना दिसत आहेत. शहरातील सर्व केंद्रांवर पहाटे पाचपासून नागरिकांच्या रांगा लागताना दिसत आहेत.
असे झाले लसीकरण
शहरी भागात आजपर्यंत पहिला डोस ३० हजार ७०६, तर दुसरा डोस ११ हजार ६९३ नागरिकांनी घेतला. एकूण ४५ हजार ३९९ नागरिकांनी पहिला डोस व दुसरा डोस घेतला आहे.
ग्रामीण भागात ८ हजार ९०४ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, २ हजार १३९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. एकूण ११ हजार ४३ नागरिकांनी पहिला व दुसरा डोस घेतला आहे. शहर व ग्रामीण भागाचे पहिला व दुसरा डोस मिळून आजपर्यंत ५६ हजार ४४२ नागरिकांनी लस घेतली आहे.
एमडी वैद्यकीय अधिकारी असावे
लोकसंख्येच्या मानाने व जिल्हा निर्मितीकडे वाटचाल करणाऱ्या भुसावळ शहराची मदार बीएएमएस डॉक्टरवर आहे. घरातील एखाद्या व्यक्तीला काही व्याधी झाल्यास कोणीही एमडी डॉक्टरकडे उपचार घेण्यासाठी वळत असतो; मात्र भुसावळसारख्या शहरात पालिका रुग्णालयात एमडी डॉक्टर नसल्याची शोकांतिका आहे. याठिकाणी नगरपालिका रुग्णालयात एमडी डॉक्टरची नियुक्ती व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यावर पडतो ताण
पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.कीर्ती फलटणकर यांच्यासह कमी स्टाफ असल्यामुळे सर्वच कामे तोकड्या स्टाफवरच अवलंबून असतात. हा ताण कमी करण्यासाठी येथे एमडी डॉक्टरांसह इतर नर्सिंग स्टाफचीही नेमणूक झाल्यास नक्कीच सद्य:स्थितीत असलेल्या स्टाफवरचा ताण कमी होईल. एरव्ही डॉ.फलटणकर या सतत कामात व्यस्त असतात.