लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील आदर्श नगर भागातील रहिवासी अनिल गोपीचंद नाथाणी (वय ५२) यांनी २२ फेब्रुवारीला शासकीय अभियांत्रिकीतील कोविड सेंटरमध्ये कोरोना चाचणी केली होती. त्याच अहवाल २५ रोजी पॉझिटिव्ह आला. मात्र त्या अहवालावर शंका असल्याने त्यांनी मुंबईतील एका खासगी लॅबला नमुने पाठवले. त्याचा २६ फेब्रुवारीला आलेल्या अहवालात त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. शासकीय अहवालात गोंधळ घालण्यात आल्याचा आरोप अनिल नाथाणी यांनी केला आहे.
नाथाणी यांनी २२ फेब्रुवारीला शासकीय अभियांत्रिकीत कोरोना तपासणी केली होती. त्यानंतर त्यांनी एक-दोन दिवसात अहवाल येण्याची वाट पाहिली. मात्र अहवाल न आल्याने त्यांनी पुन्हा महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये संपर्क साधला. त्यावेळी त्यांना तुम्हाला लवकर अहवाल हवा असेल तर जिल्हा रुग्णालयात संपर्क साधण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी जिल्हा रुग्णालयात संपर्क साधला. त्यावेळी त्यांना तुमचा अहवाल महापालिकेच्या केंद्रावरच मिळेल. असे सांगण्यात आले. अखेर २५ फेब्रुवारीला त्यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांच्या पुर्ण कुटुंबाची तपासणी करण्याचा सल्ला देखील देण्यात आला. नाथाणी यांनी खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याआधी त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरशी संपर्क साधला. त्यांना पुन्हा खासगी लॅबमधून तपासणीचा सल्ला दिला. त्यांनी मुंबईच्या एका लॅबमध्ये अहवाल पाठवले. ते अहवाल निगेटिव्ह आले. त्यांना या दरम्यानच्या काळात एकही लक्षण दिसून आलेले नव्हते.
त्यानंतर पुन्हा महापालिकेने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना घडलेला प्रकार सांगुन जाब विचारला त्यावेळी त्यांना मनपाच्या कर्मचाऱ्यांनी शांत राहण्यास सांगितल्याचेही नाथाणी यांनी सांगितले.
कोट - आधी पॉझिटिव्ह अहवाल आणि मग खासगी लॅबमध्ये निगेटिव्ह अहवाल आला आहे. त्यामुळे या अहवालांवर शंका उपस्थित होत आहे. त्याचे समाधानकारक उत्तर मनपाच्या कर्मचाऱ्यांनी दिले नाही. आमचे संपुर्ण कुटुंबच त्यामुळे दडपणात आले होते. हा प्रकार इतरांसोबत होऊ नये - अनिल नाथाणी
कोट - आमची लॅब ही सर्वात अद्यवत लॅब आहे. आमच्या लॅबमधून दिले जाणारे अहवाल हे बिनचुक असतात. त्यामुळे बाहेरच्या खासगी लॅबमध्ये काय अहवाल येत आहेत. याबाबत आपण वक्तव्य करु शकत नाही. - डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय