लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लसीकरण झाल्यानंतरसुद्धा मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि वारंवार हात धुणे ह्या त्रिसूत्रीचा अवलंब केला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व फिरते लसीकरण केंद्र, जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी, दैनिक वेतनिक आणि सुरक्षारक्षक यांच्यासाठी कोविडच्या पार्श्वभूमीवर लसीकरण सोमवारी आयोजित करण्यात आले होते. या समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन ऑनलाइन उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही. पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्राचार्य एल.पी. देशमुख, प्रा.मोहन पावरा, प्रतीभा सुर्वे, प्रभारी कुलसचिव डॉ.एस.आर. भादलीकर उपस्थित होते.
लसींचा तुटवडा होऊ देणार नाही..
जळगाव जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या कमी करण्यात जिल्हा अधिकारी, जिल्हा शल्क चिकित्सक, सर्व आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा व नागरिकांचे या सर्वांचे सहकार्य आहे. सरकार म्हणून लसीकरणाचा तुटवडा होऊ देणार नाही. महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांना लसीकरण करण्याबाबत सरकार प्रयत्नशील आहे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. प्रा.ई.वायुनंदन यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले की, महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक यांचे लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. शासनाकडून विद्यापीठास नेहमीच सहकार्य मिळत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी कुलसचिव डॉ.भादलीकर यांनी केले. सूत्रसंचलन व आभार सुभाष पवार यांनी मानले.
१६० कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस
लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष बडगुजर, डाटा ऑपरेटर प्रदीप पाटील, आरोग्य कर्मचारी विकास धनगर, संगीता साळुंखे, हितेश महाजन उपस्थित होते. यावेळी विद्यापीठातील १६० कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला.
यांनी घेतले परिश्रम
शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. किशोर पवार, विद्यापीठ अभियंता आर.आय. पाटील, एस.आर. गोहिल, बी.पी. पाटील, डॉ. सोमनाथ वडनेरे, अरुण सपकाळे, राजू सोनवणे, प्रमोद चव्हाण, दीपक गावीत, चंद्रकांत इसे, बाळासाहेब पाटील, बलभीम गिरी, मयूर पाटील, पद्माकर कोठावदे, के.सी. पाटील, मनोज वराडे, मृणालिनी चव्हाण, शेखर बोरसे आदींनी परिश्रम घेतले.