लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दोन्ही मुलीच झाल्या. मुलगा होतच नाही म्हणून सासरच्यांकडून सतत होणाऱ्या छळाला कंटाळून माधुरी राजेंद्र पाटील (वय ३१, रा.आव्हाणे, ता.जळगाव) या विवाहितेने गुरुवारी सकाळी सहा वाजता जळगाव शहरातील प्रेम नगराजवळ धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी पती राजेंद्र दिलीप जाधव, सासरे दिलीप रामचंद्र जाधव, सासू संजूबाई दिलीप जाधव व जेठ चंद्रकांत दिलीप जाधव यांच्याविरुध्द जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त व छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडील रामचंद्र वामन पवार (वय ६२,रा.पढावद, ता.शिंदखेडा, जि.धुळे) यांनी फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतरच माहेरच्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. माधुरी यांना दोन मुली आहेत. २००७ मध्ये त्यांचा आव्हाणे, ता.जळगाव येथे विवाह झाला होता. चार महिन्यापासून माधुरी माहेरीच होत्या. बुधवारी मुलींना भेटण्यासाठी त्या आल्या असता पती व सासरच्यांनी त्यांची भेट होऊ न देता हाकलून लावले होते. या संतापात माधुरी यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली.