जळगाव : रिक्षा चालकासोबत वाद घालणाऱ्या तिघांना हटकणाऱ्या रफिक शेख मजीद मन्यार (३१,रा.मन्यारवाडा) या तरुणावर एकाने चाकूने हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी साडे तीन वाजता सुभाष चौकातील भवानी मंदिराजवळ घडली. याप्रकरणी तिघांविरुध्द शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मन्यारवाड्यातील रफीक शेख मजीद मन्यार या तरुणाचे रथ चौकात इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास रफीक शेख दुचाकीने (क्र. एम.एच. १९ सी.टी १८३४ ) सुभाष चौकातून रथ चौकाकडे जात असतांना भवानी मंदिराजवळ तीन जण एका रिक्षावाल्यासोबत वाद घालीत होते. रफीक शेख यांनी त्या तरुणांना हटकले असता त्या तिघांनी रफीकला मारहाण करण्यास सुरुवात केली.यापैकी एकाने चाकूने पोटावर वार केला तर दुसऱ्याने त्यांच्याकडील दुचाकी जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. दरम्यान, या घटनेनंतर रफीक शेख यांनी वसीम शेख, रहिम मन्यार, अख्तर शेख रहीममुल्ला मन्यार, जुलकरनैन शेख गुलाम रसुल यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत त्या तिघा इसमांचा शोध घेतला. परंतु ते तिघे मिळून न आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी रफीक शेख मजीद मन्यार याच्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाद घालणाऱ्या तिघांना हटकले अन् चाकू हल्ला करुन दुचाकी लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:16 IST