कुरंगी, ता. पाचोरा : घरच्या गाईंना दुपारी गावाबाहेर असलेल्या लहान तलावात बैलगाडीला बांधून पाणी पाजण्यासाठी घेऊन जात असताना बैल उसळले. त्यावेळी तलावाच्या पाण्यात तिन्ही गाईंचा बुडून मृत्यू झाला.
कुरंगी (ता. पाचोरा) येथील शांताराम उत्तम पाटील यांच्या मालकीच्या तीन गाई दि. ८ जुलै रोजी दुपारी पाणी पाजण्यासाठी बैलगाडीला बांधून गावाबाहेर असलेल्या लहान तलावात घेऊन गेले असता बैलगाडीला जुंपलेले बैल पाण्यात उसळले. बैलगाडीला मागे बांधलेल्या दोन दुधाळ गाई व एक गाभण असलेली गाय अशा तीन गाईंचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. या अल्पभूधारक शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला असून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे. बैल आणि मालक बालंबाल बचावले.
तलावाच्या खोल पाण्यात बैलगाडी गेल्यानंतर मालक शांताराम पाटील यांनी विळ्यावर गाडीला जुंपलेल्या बैलाच्या जोताला कापून काढले. त्यामुळे बैलही बचावले व मालकही बचावला.