भडगाव : लग्नानंतर अवघ्या दहा दिवसातच नववधूने ५० हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन धूम ठोकल्याची घटना तालुक्यातील शिंदी येथे घडली. याप्रकरणी नववधूसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षरा मनोज रंधे (नशिराबाद, ता. जळगाव), सोनाली गोकुळ सोनार (साकेगाव, ता. भुसावळ), आशा नानासाहेब निकम (अनकवाडे, वंजारवाडी, नाशिक), गोकुळ रवींद्र सोनार (साकेगाव, ता. भुसावळ), अशोक वीरसिंग खाडे (मालदा, ता. शहादा), गुड्ड्याबाई समाधान शिंपी (गाळण, ता. पाचोरा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
शिंदी येथील २८ वर्षीय तरुण प्रमोद राजाराम शिंपी या तरुणाचा विश्वास संपादन करून सोनालीसह पाच लोकांनी लग्नासाठी ओळखीचे स्थळ दाखविले. त्यासाठी दीड लाख रुपये खर्च करावे लागतील असेही सांगितले. त्यानुसार तरुणाच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी होकार दिला. ३० ऑगस्ट रोजी अक्षरा रंधे हिच्याशी लग्न लावून देण्यात आले. दरम्यान, तरुणासोबत नवविवाहिता राहिल्यानंतर भुसावळ येथे बहीण-पाहुण्यांना भेटण्यास जाते, असे सांगून घरून नववधू निघाली, मात्र ती परतलीच नाही. सोबत दागिने घेऊन पसार झाली.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रमोद शिंपी यांनी नववधूसह वरील सहा जणांविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून भडगाव पोलिसांत भादंवि कलम ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार पांडुरंग सोनवणे करीत आहेत.