जळगाव : सावखेडा ता. जळगाव शिवारातील गिरणा नदी पात्रात वाळु चोरी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सावखेडा तलाठ्यांचे पथक या ठिकाणी पोहचले. महसुल विभागाचे वाहन या ठिकाणी पोहचल्याचे लक्षात आल्यावर येथे पळापळ झाली आणि वाळु चोरांनी वाहनांसहित नदीपात्रातून धुम ठोकली. ही घटना गुरूवारी घडली. बुधवारी देखील असाच प्रकार गिरणा नदी पात्रातच घडला होता.
जिल्ह्यातील सर्व वाळु गटांची मुदत १० जून रोजीच संपुष्टात आली आहे. त्यामुळे सध्या बेकायदेशीर उपसा होत आहे. जळगाव तालुक्यात देखील एक एप्रिल पासून २६ वाळु उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तरीही दिवसभर शहराला लागुन असलेल्या गावांच्या शिवारात वाळु उपसा सुरू असतो. त्यावर कारवाई करण्यासाठी महसुलच्या पथकाने बुधवारी धाड टाकली. मात्र त्यावेळी चाहुल लागल्याने वाळु चोर पळून गेले होते. असाच प्रकार गुरूवारी देखील घडला. या घटनेला तहसीलदार नामदेव पाटील यांनी देखील दुजोरा दिला.