जळगाव : गेली ३४ वर्ष जळगावातून निवडून येत असलेल्या आमदार सुरेशदादा जैन यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवून राजकीय पटलावरून दूर करण्याचे राजकारण सुरू आहे. मात्र विरोधकांच्या या कारवायांना प्रत्युत्तर म्हणून येत्या विधानसभा निवडणुकीत सुरेशदादांना महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणू, असा निर्धार शिवसेनेच्या रविवारी झालेल्या संकल्प मेळाव्यात हजारो कार्यकर्त्यांनी केला.
या वेळी राजेश जैन यांनी सुरेशदादांचा खास संदेश वाचून दाखविताना उमेदवारी करावी की नाही? अशी विचारणा सुरेशदादा यांनी केली असल्याचे सांगताच उपस्थित कार्यकर्त्यांनी 'जय भवानी जय शिवाजी', 'सुरेशदादा आगे बढो'च्या घोषणा देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हजारोंची उपस्थिती
मेळाव्याचे अध्यक्ष आर.ओ. पाटील म्हणाले की, ज्या ठिकाणी आमदार अथवा इच्छुक उमेदवार स्वत: उपस्थित असतो, त्या ठिकाणी देखील कार्यकर्त्यांची व सर्मथकांची जितकी उपस्थिती नसते, त्याहून अधिक उपस्थिती सुरेशदादांच्या अनुपस्थितीत आहे. यावरून सुरेशदादांबद्दलची आपुलकी, प्रेम दिसून येते.