लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात गेल्या चार दिवसात चार तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. अगदी १७ वर्षापासून तर ३५ वयोगटातील तरुणांचा त्यात समावेश आहे. तरुणांच्या या वाढत्या आत्महत्या चिंतेची बाब असून धोक्याची घंटा आहे.
कोरोनाच्या काळात सर्वच उद्योग, व्यवसाय बंद असल्याने अनेकांच्या हातचा रोजगार गेला. त्यातून ताणतणाव, नैराश्य वाढण्यासह व्यसनाधिनतेकडेही कल वाढत चालला आहे.
दोन दिवसापूर्वी ३० मे रोजी दोन तरुणांनी शहरात आत्महत्या केल्या. आईला मायग्रेनचा आजार, वडिलांवर कर्करोगाची शस्त्रक्रिया झालेली व त्यात स्वत:लाही मायग्रेनचा आजार जडला. त्याशिवाय लॉकडाऊनमुळे उद्योग धंदे बंद, त्याचा परिणाम कुटुंबाच्या उदरर्निवाहावर झाला. यामुळे नैराश्यात आलेल्या इम्रान खान अकील खान या २४ वर्षीय तरुणाने मेहरुणमधील शिवाजी उद्यानातील विहिरीत उडी घेऊन जीवन संपविले. तर त्याच दिवशी रात्री खोटे नगरात किशोर भाऊलाल पाटील या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले. किशोर हा मुळचा चांदसणी, ता.चोपडा येथील रहिवाशी होता. स्वत: पेंटरकाम करायचा तर पत्नी खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत होती. मात्र लॉकडाऊनमुळे रोजगार थांबला, व्यसनाधिनता वाढली, त्याच तणावात किशोरने आत्महत्या केल्याची बोलले जात आहे. सर्वात चटका लावणारी घटना दिनेश गुलाबराव मोरे या मुलाच्याबाबतीत घडली. अवघ्या १७ व्या वर्षी त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. त्याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. भुसावळच्या सुशिक्षित तरुणाने जळगावात येऊन रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली.
कोरोनाने हिरावला रोजगार
कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे अनेकांचा रोजगार थांबला आहे. दीड वर्षापासून कोणताच उद्योग किंवा व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरु होत नाही, त्यामुळे अनेकांचा हाताचा रोजगार गेला. घरभाडे, दैनंदिन खर्च, घर संसार आदी बाबींची पूर्तता करताना अनेक जण नाकी नऊ येऊ लागले आहेत. गेल्या वर्षी देखील कोरोनाने रोजीरोटी थांबल्यामुळे आत्महत्येच्या घटना घडल्या होत्या. तरुणांच्या आत्महत्या या चिंताजनक आहेत. त्यांच्यामागे असलेले कुटुंब उघड्यावर येत आहे.
अशा आहेत शहरातील आत्महत्येच्या घटना
२८ मे : राहूल राजाराम निलम (वय ३५, मुळ रा.भुसावळ)
२९ मे : दिनेश गुलाबराव मोरे (वय १७, रा. हरिविठ्ठल नगर)
३० मे : किशोर भाऊलाल पाटील (वय ३२, रा.खोटे नगर)
३० मे : इम्रान खान अकील खान (वय २४, रा.मेहरुण)