जळगाव : शहरात सुरू असलेल्या अमृत योजना आणि भूमिगत गटारींच्या कामासाठी गल्लोगल्ली चाऱ्या खोदल्या असून खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल शनिवारी विविध प्रभागातील नागरिकांनी महापौरांकडे तक्रारींचा पाढा वाचला. या तक्रारींची दखल घेत महापौर भारती सोनवणे यांनी अमृत व भुयारी योजनेच्या मक्तेदारांनी ही कामे थांबवून, आधी खड्डे बुजविण्याच्या सूचना केल्या.
महास्वच्छता अभियानातंर्गत शनिवारी महापौरांनी प्रभाग १६, १७ व १८ चा पाहणी दौरा केला. यावेळी उपमहापौर सुनील खडके, नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी, नगरसेविका रंजना वानखेडे, रेश्मा काळे, मनोज आहुजा, भरत सपकाळे, गोकुळ पाटील, कुंदन काळे, विजय वानखेडे, सहआयुक्त पवन पाटील, शहर अभियंता अरविंद भोसले, योगेश बोरोले, एस. एस. पाटील, बाबा साळुंखे आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महापौरांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत संबंधित ठेकेदारांना अमृत आणि भूमिगत गटारींची कामे त्वरित बंद करून, अगोदर ज्याठिकाणी खड्डे खोदले आहे. तेथील खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे सांगितले. यावेळी नागरिकांनी मासुमवाडी परिसरात असलेला मोठा नाला दुसऱ्या बाजूला योग्य पध्दतीने जोडण्यात आलेला नसल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याचे सांगितले. यावेळी महापौरांनी नाल्याच्या दुरुस्तीकामी अंदाजपत्रक तयार करण्याच्याही सूचना केल्या.
इन्फो :
गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस
बुधवारी महास्वच्छता अभियानासाठी मनपाच्या ४३६ कायम कर्मचाऱ्यांपैकी ३९४ तर मक्तेदाराचे ४०० पैकी ३७६ कर्मचारी हजर होते. यामध्ये मनपाच्या ४२ गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तर मक्तेदाराच्या २४ गैरहजर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातून २८७ टन कचरा संकलित करण्यात आला आहे.