चाळीसगाव : बेलगंगा साखर कारखाना सुरू करावा या मागणीसाठी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, कारखाना प्रशासक यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी यांचे शिष्टमंडळ जिल्हा बँक चेअरमन व संचालक मंडळातील सदस्यांना भेटले. पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपयांचा हप्ता भरून इतर रक्कमही वर्षभरात परतफेड करण्यासंबंधी बँकेला पत्र सादर करण्यात आले. बेलगंगा कामगार युनियनचे कार्यकारी अध्यक्ष धीरज येवले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बँक चेअरमन, आमदार चिमणराव पाटील व संचालकांशी यासंबंधी चर्चा केली. कारखाना सुरू करण्यासाठी दवे फायनान्स कंपनी, पुणे या संस्थेने पाच कोटी रुपये बँकेला पहिला हप्ता भरण्यास तयार आहोत, असे कारखाना प्रशासकांना लेखी कळविले होते. त्यानुसार प्रशासकांनी बँकेला ही बाब कळविली व त्यानंतर कारखाना स्थळावर प्रशासक यांनी सर्वसाधारण सभा घेऊन सभासदांशी चर्चा केली. त्यात कारखाना सुरू करण्याचा ठराव सभासदांनी एकमताने मंजूर केला. प्रशासकासह सभासदांना बँकेने चर्चेसाठी बोलविले होते. त्यानुसार शिष्टमंडळाने कारखाना सुरू करण्याबाबतचे पत्र, सभासदांनी मंजूर केलेला ठराव या वेळी देण्यात आले व पाच कोटी रु.चा पहिला हप्ता बँकेत भरल्यानंतर कारखान्याचे कर्ज ‘वन टाईम सेटलमेंट’ (ओटीएस) या तत्त्वावर हिशोब करून उर्वरित रक्कम ११ महिन्यात भरण्यासंबंधी या वेळी शिष्टमंडळाने बँक चेअरमन पाटील यांच्याशी चर्चा केली. ऊस उत्पादकांचे हाल बेलगंगा बंद असल्यामुळे परिसरातील साखर कारखाने मनमानी करून उसाला कवडीमोल भाव देऊन शेतकर्यांची आर्थिक लूट करीत आहे. शेतकरी, कामगार हित लक्षात घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी बँकेने परवानगी द्यावी, अशी मागणी धीरज येवले व शिष्टमंडळाने केली. बेलगंगा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच बँकेच्या बैठकीत ठेवून त्यासंबंधी सकारात्मक निर्णय घेण्याबाबत आवश्यक विचार करू व तसे आपल्याला कळवू, असे आश्वासन बँक चेअरमन चिमणराव पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात भडगावचे माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, जि.प. सदस्य प्रभाकर जाधव, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महेंद्र पाटील, तालुकाप्रमुख धर्मा काळे, जळगावचे शहरप्रमुख गजानन मालपुरे, कारखाना प्रशासक सुभाष येवले, व्ही.आर. पाटील, देवळीचे सरपंच भगवान पाटील, अलवाडी सरपंच संजय पाटील, तामसवाडी सरपंच विक्रम पाटील, सायगावचे नथ्थू पाटील, किरण राखुंडे, शिंदी सरपंच अनिल जाधव, बहाळचे सोपान महाजन, साहेबराव काळे, बापू श्यामराव पाटील, बापू देवसिंग पाटील हातगाव यांचेसह चाळीसगाव तालुक्यातील पन्नास ते साठ ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
बेलगंगेसाठी बँकेला साकडे
By admin | Updated: May 19, 2014 02:09 IST