लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेलामध्ये सुरू असलेल्या चढ-उतारमध्ये या आठवड्यात तेलाचे भाव पुन्हा वधारले आहे. सोयाबीन, शेंगदाणा तेलासह या आठवड्यात तर सूर्यफुलाच्या तेलाच्याही भावात वाढ झाली आहे.
यासोबतच उन्हाळ्याची चाहूल लागताच हिरव्या पालेभाज्यांचे भाव वाढू लागले आहे. गेल्या दोन महिन्यापासून खाद्य तेलाच्या भावात चढ-उतार सुरू आहे. यात गेल्या आठवड्यात सोयाबीन तेलाचे भाव १२० ते १२५ रुपये प्रति किलोवर पोहचले होते. त्यानंतर याही आठवड्यात ही भाववाढ कायम राहत तेलाचे भाव १३० ते १३५ रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत.
शेंगदाणा तेलातही पुन्हा भाववाढ होऊन ते १७० ते १७५ रुपये प्रति किलोवर पोहचले आहे. या आठवड्यात तर सूर्यफूल तेलाच्याही भावात वाढ होऊन ते १४५ ते १५५ रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत.
साखरेचा गोडवा कायम
आता सणवार नसताना व मागणीही फारसी नसताना खाद्य तेलाच्या भावात वाढ होत आहे. असे असले तरी इतर किराणा साहित्याचे भाव मात्र स्थिर आहे. साखर अजूनही ३६ रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.
पालेभाज्यांना भाव
गेल्या काही दिवसांपासून भाव कमी असलेल्या हिरव्या पालेभाज्यात काहीसी वाढ होत आहे. कोथिंबीर ५० रुपये किलो तर मेथीही ४० रुपये किलोवर पोहचली आहे.
कांद्यांनी आणले डोळ्यात पाणी
गेल्या काही दिवसांपासून बटाट्याचे भाव कमी होऊन ते २५ ते ३० रुपये प्रति किलोवर आले आहेत. मात्र कांद्याचे भाव अजूनही ४० रुपयांच्या खाली येत नसल्याचे चित्र आहे. टमाटे २० ते २५ रुपये प्रति किलोवर पोहचले असून त्यांची आवक चांगली आहे.
खाद्य तेलाचे भाव पुन्हा वाढल्याने दर आठवड्याला आर्थिक भार वाढतच आहे. या शिवाय कोथिंबीर, हिरव्या पालेभाज्याही महाग होत आहे.
- शंकर महाजन, ग्राहक
खाद्य तेलाच्या भावात या आठवड्यात पुन्हा वाढ झाली आहे. शेंगदाण्याच्या भावात असलेली वाढ अजूनही कायम आहे.
- सचिन छाजेड, व्यापारी
सध्या हिरव्या पालेभाज्यांचे भाव काहीसे वाढले आहे. कोथिंबीर ४० व मेथीची भाजी ५० रुपये प्रति किलोवर पोहचले.
- संजय वाणी, भाजीपाला विक्रेते