लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला दिलेल्या १०० कोटींच्या निधीतून एकही काम झालेले नाही. या निधीतून भाजपने कामांचे नियोजन केले होते. मात्र, शिवसेनेने महापालिकेत सत्तेत आल्यानंतर भाजपने १०० कोटी रुपयातून होणाऱ्या कामांचा ठराव रद्द केला. हा ठराव रद्द केल्यानेच शहरातील कामे थांबली असून, हा ठराव रद्द झाला नसता तर शहरात १०० कोटींच्या निधीतून कामांना सुरुवात झाली असती असा आरोप भाजपचे गटनेते भगत बालाणी व उपगटनेते राजेंद्र घुगे-पाटील यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केला आहे.
शहरातील रस्त्यांची अक्षरश वाट लागली आहे. राज्य शासनाकडून तीन वर्षांपुर्वी १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. मात्र, तीन वर्ष होवून देखील या निधीतून एकही रुपया खर्च झालेला नाही. याबाबत ‘लोकमत’ ने मंगळवारच्या अंकात वृत्त प्रकाशीत केले होते. यानंतर भाजपकडून प्रसिध्दीपत्रक काढून हा निधी अद्यापही अखर्चीत असल्याबाबत शिवसेनेला जबाबदार धरले आहे. भाजपकडून काढण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, मनपाला नगरोथ्थान योजने अंतर्गत ३ वर्षापुर्वी १०० कोटीचा निधी मंजुर झाला होता. त्यापैकी ४२ कोटीची कामांची निविदा निघुन ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला व त्यापैकी ५८ कोटींची प्रस्तावीत कामे तांत्रीक अडचणीमुळे प्रलंबीत आहे. दरम्यान, लोकसभा व विधानसभा ची आचारसंहिता असल्याकारणाने या कामांमध्ये दिंरगाई झाली. मात्र, त्यानंतर शिवसेनेचे सरकार राज्यात आल्यानंतर या सरकारने या निधीवर स्थगिती आणली, महापालिकेतही शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, या निधीवरील स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी १०० कोटीमधून होणारी कामे रद्द करण्याचा ठराव केला. यामुळे ही कामे रखडली, आता शिवसेनेने राज्य सरकारकडून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणावा असे आव्हान देखील भाजपकडून देण्यात आले आहे.