जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर तब्बल दहा महिन्यांनी बुधवारी इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गांची घंटा वाजणार आहे. या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज आहेत. शाळेच्या भिंतींवर आकर्षक रंगरंगोटी केली असून, काही ठिकाणी कोरोनापासून बचाव व्हावा, म्हणून काय करावे, याबाबतच्या सुचना फळ्यांवर अक्षरात लिहिल्या होत्या. तर वर्गांची साफसफाई केल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले.
जळगाव जिल्ह्यात पाचवी ते आठवीची वर्ग असलेल्या दोन हजारांवर शाळा आहेत. या शाळांमध्ये ७ हजार ४६५ शिक्षक, तर २ हजार २९८ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या वर्गांना प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधींनी सोमवारी खासगी व मनपा शाळांमध्ये पाहणी केली.
सॅनिटाईज, तापमापन मोजूनच प्रवेश
बळीराम पेठेतील मनपा शाळा क्रमांक १७मध्ये पाहणी केल्यावर त्याठिकाणी शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण साफसफाई करण्यात आली होती. सॅनिटाझर व थर्मल गन आणून ती ठेवण्यात आली होती. बुधवारी विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारावर थांबवून त्यांचे तापमान मोजून व सॅनिटाईज करून वर्गात प्रवेश दिला जाईल, असे प्रभारी मुख्याध्यापिका फातिमा तडवी यांनी सांगितले. ४५ विद्यार्थी असून, त्यापैकी २० पालकांनी संमती दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या स्वागताला बोलक्या भिंती
मनपा चौबे शाळेतही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे़ वर्गाबाहेर चित्र काढून त्याद्वारे अभ्यासक्रम देण्यात आला आहे. त्याचबरोबर ‘दो गज दुरी, मास्क है जरूरी, माझी शाळा माझी जबाबदारी, आता आमचं ठरलंय’ असेही भिंतीवर लिहिण्यात आले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज असून, वर्गात निर्जंतुकीकरण फवारणी केली असून, विद्यार्थ्यांना संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे मुख्याध्यापक राजेंद्र राजपूत यांनी सांगितले.
बहुतांश पालकांचा ना!
चाळीस ते पन्नास टक्के पालकांनी पाल्यांना शाळेस पाठविण्यास संमती दर्शविली आहे. मात्र, अजूनही पन्नास टक्के पालकांचा पाल्यास पाठविण्यास नकार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शाळेत आल्यावरच विद्यार्थ्यांची उपस्थिती संख्या समजणार आहे. जळगाव जिल्ह्यात ३ लाख १० हजार विद्यार्थी आहेत.