लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव आणि भडगाव तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने मोठी हानी झाली आहे. यात तीन तालुक्यांमधील ३८ गावे बाधित झाले असून प्रशासनातर्फे याच्या पंचनाम्यांचे काम सुरू आहे. अतिवृष्टीग्रस्तांना मुंबई येथील श्री सिध्दीविनायक गणपती मंदिर न्याय यांच्यातर्फे मदत मिळावी यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अर्जाद्वारे विनंती करून साकडे घातले आहे.
३० आणि ३१ ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे चाळीसगाव शहरालाही फटका बसला आहे. पुराचा फटका बसलेल्या गावांमधील तीन जणांचा यात मृत्यू झाला असून १५५ लहान आणि ५०७ मोठी गुरे मृत्युमुखी पडली आहेत. मुसळधार पावसामुळे ६५८ घरे अंशत: तर ३८ घरे पूर्णत: नुकसान झाले आहे. तसेच यात ३०० घरांचे नुकसान झालेले आहे. चाळीसगाव तालुक्यात दोन ठिकाणी मदत छावणी उभारण्यात आलेली आहे. या सर्वांना शासनातर्फे मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. मात्र अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासतर्फे भांडे, कपडे, शेगड्या आदींसह जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात यावी, अशी विनंती करणारे पत्र जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पाठविले आहे. या संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वत: पाठपुरावा करून मदत मिळवून देणार असल्याची ग्वाही दिली आहे.