लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव- महानगरपालिका हद्दीत मिळकतीची फेरमूल्यांकनाच्या सर्वेक्षणाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. मध्यंतरी कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे हे काम सात महिने थांबले होते. आता पुन्हा या कामाला नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून, फेरमूल्यांकन आकारणी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. शहरात मनपाच्या दप्तरी ९६ हजार ९४५ मिळकती होत्या. सर्वेक्षणानंतर आता १ लाख १६ हजार मिळकतींची नोंद करण्यात आली असून, लवकरच सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे मनपाचे दुप्पटीने उत्पन्न वाढणार आहे.
मनपा हद्दीतील मिळकतींवर मालमत्ता कर लावण्यासाठी आकारणी केली जाते. मनपा प्रशासनानेदेखील आकारणी ज्यावेळी केली त्यावेळी आकारणी करताना तळमजला १०० टक्के, पहिला मजला ७५ टक्के तर दुसऱ्या मजल्यापेक्षा अधिक मजले असल्यास ५० टक्के यानुसार आकारणी केली जात होती. दरम्यान, केंद्रीय लेखापरीक्षण करण्यात आल्यानंतर आक्षेप नोंदविण्यात आले होते. १९९७ ते २०१७ पर्यंत करण्यात आलेली मालमत्ता कराची आकारणी चुकीची केल्याचा आक्षेप घेण्यात आल्यानंतर फेरमूल्यांकनाचा मनपा प्रशासनाने निर्णय घेतला होता.
सर्वेक्षणात १९ हजार ५५ मिळकतींची वाढ
शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करून फेरमूल्यांकन करण्यासाठी मनपाने २०१७ ला अमरावती येथील स्थापत्य एजन्सीला मक्ता दिला. त्यानुसार एजन्सीच्या माध्यमातून प्रत्येक मिळकतींना नंबरींग केले. त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जावून मोजमाप केले. घराचे फोटो काढून नकाशे तयार केले, तसेच ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षण करण्यात आले आहे. मनपा हद्दीत आधी ९६ हजार ९४५ मिळकती होत्या. सर्वेक्षणानंतर आता १ लाख १६ हजार मिळकतींची नोंद करण्यात आली असून, तब्बल १९ हजार ५५ मिळकतींची वाढ झाली आहे. मालमत्ता करातून मनपाला ३० कोटींचे उत्पन्न मिळायचे. भविष्यात या मालमत्तांची नोंदणी झाल्यानंतर व मालमत्ताचे दर निश्चित केल्यानंतर ६० ते ६५ कोटींचे उत्पन्न मनपाला मिळणार आहे.
अशी आकारणी
मनपा हद्दीतील मिळकतींची आकारणी करताना तळमजला १०० टक्के, पहिला मजला ७५ टक्के तर दुसऱ्या मजल्यापेक्षा अधिक मजले असल्यास ५० टक्के यानुसार आकारणी केली जात होती; मात्र आता फेरमूल्यांकनात तळमजला, पहिला मजला १०० टक्के, दुसरा मजला ९५ टक्के, तर तिसऱ्या मजल्यापासून ९० टक्के प्रमाणे आकारणी केली जात आहे, तसेच बहुमजली इमारतीत एक ते चौथ्या मजल्यापर्यंत टक्के आकारणी तर पाचव्या मजल्यापासून ५ टक्क्याने वाढ करत १०५ टक्क्यांनी आकारणी करण्यात आली असून, लवकरच सुनावणी होणार आहे.
नळकनेक्शन देण्यात यावे - प्रशांत नाईक यांची मागणी
दरम्यान, नवीन फेरमूल्यांकनाचे काम हाती घेण्यात आले असले, तरी नवीन मालमत्ताधारकांची सुनावणी बाकी असल्याने त्यांना मालमत्ताकरासाठी नोंद झालेली नाही, अशा नागरिकांना नवीन कनेक्शन घेताना अडचणी येत असून, थांबलेली सुनावणी प्रक्रिया घेऊन लवकरच नवीन मालमत्ताधारकांना नळ कनेक्शन देण्यात यावे, अशी मागणी प्रशांत नाईक यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. मागेल त्याला नळ कनेक्शन देण्यात यावे, अशीही मागणी नाईक यांनी केली.