जळगाव : आधीच विद्यार्थी परिषदेची निवडणूक उशिराने झाली. ती होऊन आता दोन महिने उलटल्यानंतरही विद्यार्थी परिषदेची एकही बैठक झालेली नाही. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला या बैठकीचा विसर पडला की काय? असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या धामधूममध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला विद्यार्थी परिषदेची निवडणूक घेण्यासाठी मुहूर्त सापडत नव्हता. या निवडणुका आटोपल्यानंतर यशावकाश विद्यापीठाने १६ नोव्हेंबरला विद्यार्थी परिषदेची निवडणूक घेतली. मात्र, निवडणूक होऊन दोन महिने झाले तरीही विद्यार्थी परिषदेची एकही बैठक घेतलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
विद्यापीठस्तरावर विद्यार्थ्यांना येणार्या अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी व विद्यापीठातील प्रशासकीय कामकाजाबाबत माहिती व्हावी या उद्देशाने राज्यातील सर्व विद्यापीठात विद्यार्थी परिषदेची स्थापना केली जाते. अध्यक्ष व सचिव यांच्यासह सदस्यांची निवड निवडणुकीद्वारे केली जाते. त्यानुसार यावर्षी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदाची सौरभ देशमुख व सचिवपदाची राहुल गावीत यांनी सूत्रे स्वीकारली.
अध्यक्ष भडगाव पालिकेच्या निवडणुकीत व्यस्त
दोन महिने झाले अद्याप विद्यार्थी परिषदेची बैठक का झाली नाही? याबाबत 'लोकमत'ने अध्यक्ष देशमुख व सचिव गावीत यांच्याशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता देशमुख म्हणाले की, भडगावची नगरपालिकेची निवडणूक लागल्यामुळे या निवडणूक कार्यक्रमात व्यस्त आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्या सोडवत आहोत. १६ जानेवारीला दुपारी एक वाजता विद्यार्थी परिषदेची बैठक घेण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक आजारी
सचिव गावीत याने विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक आजारी आहे. तसेच युवारंगच्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे विद्यापीठातील अधिकार्यांशी चर्चा होऊ शकत नसल्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही.
--------
दरम्यान, नियमानुसार विद्यार्थी परिषदेची निवडणूक झाल्यानंतर सात दिवसांच्या आत विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांची तत्काळ बैठक बोलवली जाते. यात सदस्यांना नियमावली समजून सांगितली जाते. मात्र, यंदा ही बैठकदेखील झालेली नाही, असे सचिव गावीत यांनी दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.