जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्र-कुलगुरू यांच्यावर संशोधन चौर्याचा आरोप असताना सुध्दा कुठलीही समिती गठीत केली गेली नाही. चौकशी करून कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी संघटनांनी सोमवारी कुलगुरूंच्या कार्यालयात प्र-कुलगुरूंनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी गोंधळ घातला.राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटना व जिल्हा एनएसयुआय या विद्यार्थी संघटनांच्यावतीने विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पी.पी.माहुलीकर यांच्यावर संशोधन चौर्याचा आरोप करण्यात आला होता. नंतर प्र-कुलगुरूंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कुलगुरूंकडे केली होती. पण, कुठलीही कारवाई न झाल्यामुळे सोमवारी दुपारी सिनेट सदस्य विष्णू भंगाळे, जिल्हा एनएसयुआयचे देवेंद्र मराठे, युवा सेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव कुणाल पवार, अनिकेत पाटील यांनी कुलगुरूंचे कार्यालय गाठत जाब विचारला. त्यानंतर प्र-कुलगुरू यांनी राजीनामा द्यावा, यासाठी विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी चांगलाच गोंधळ घातला. तसेच कुठलीही समिती गठीत केली गेली नसल्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.
अन्यथा आंदोलन
संशोधन चौर्य प्रकरणात तत्काळ समिती गठीत करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, तसेच आजपर्यंत केलेल्या तक्रारींवर दोन दिवसात खुलासा देण्यात यावा, अशी मागणी कुलगुरूंकडे विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींकडून करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्यात येईल व पोलिसात तक्रार देण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला.