जळगाव : आपत्तीप्रवण असलेल्या गावांचे सर्वेक्षण करून जिल्ह्यातील शंभर गावांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आदेश गुरूवारी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशासकीय यंत्रणेला दिले. जिल्हा नियोजन भवनात महाराष्ट्र राज्य आपत्ती जोखीम व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत आपत्ती धोके व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हाभरात आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, पुरवठा अधिकारी विकास गजरे, राष्ट्रीय छात्रसेनेचे कर्नल के.व्ही.विठ्ठल, मनपा उपायुक्त प्रदीप जगताप, ५ बटालियन राष्ट्रीय आपत्ती दलाचे कुमार राजीवरंजन तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे नरविरसिंग रावळ उपस्थित होते. राजीवरंजन यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची माहिती देऊन या दलाचे देशातील विविध नैसर्गिक आपत्ती व त्यांच्या मदत कार्यात केलेल्या कामगिरीची माहिती दिली. प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार नरवीरसिंग रावळ यांनी मानले. जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख, मनपा, नगर पालिका, तहसील कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्ह्यातील २३ विभागाच्या अधिकारी कर्मचार्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. या कार्यक्रमात सात कार्यशाळा शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेचा शाळा सुरक्षा आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. आपत्ती निवारणार्थ १६ पथके गठीत जिल्हाधिकार्यांनी आपत्ती निवारणात आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व सांगितले. जिल्ह्यातील सर्वच कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयाचा आपत्ती व्यवस्थापन नकाशा तयार करावा व सर्व कर्मचार्यांना आपत्तीच्या प्रसंगी काय करावे? यासाठी प्रशिक्षण द्यावे, प्रशिक्षणाला कर्मचार्यांनी प्रतिसाद द्यावा. स्थानिक पातळीवरील स्वयंसेवी संस्थांना त्यात सहभागी करून घेण्याच्या सूचनाही देऊन प्रशिक्षित मनुष्यबळाची १६ पथके जिल्ह्यात आपत्ती निवारणार्थ गठीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकार्यांनी दिली. |