नंदुरबार : जिल्ह्यात नजर अंदाज पीक पैसेवारीवरून सर्वच महसुली गावे दुष्काळी जाहीर करण्यात आली आहे. असे असले तरी सुधारित व अंतिम पीक पैसेवारी जाहीर झाल्यानंतर त्यातील काही गावे कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अर्थात शासकीय पातळीवर काय धोरणात्मक निर्णय घेतला जातो त्यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण दुष्काळी स्थिती लक्षात घेता घेण्यात आलेला निर्णय कायम ठेवावा, अशी अपेक्षा शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे. 14 वर्षानंतर प्रथमच संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या नजर अंदाज पीक पैसेवारीच्या आधारावर शासनाने दुष्काळ जाहीर केलेला आहे. त्यामुळे हा निर्णय कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच आता सुधारित आणि अंतिम पैसेवारीवर काही गावे वगळली जाण्याची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे नाराजीही व्यक्त होत आहे. सर्वच गावे 50 पैशांच्या आत सप्टेंबर महिन्याच्या दुस:या आठवडय़ात जाहीर करण्यात आलेल्या नजर अंदाज पीक पैसेवारीनुसार जिल्ह्यातील सर्वच 885 महसुली गावांची पैसेवारी 50 पैशांच्या आत जाहीर करण्यात आली होती. तसा अहवालही शासनाकडे पाठविण्यात आला होता. शासनाने सुधारित आणि अंतिम पैसेवारीची वाट न पाहता सरसकट दुष्काळ जाहीर करून टाकला आहे. या माध्यमातून तरी शेतक:यांना मदतीचा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. आतार्पयतच्या धोरणानुसार नोव्हेंबर महिन्यात अंतिम पीक पैसेवारी जाहीर झाल्यानंतर दुष्काळ जाहीर केला जात असतो. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात सरसकट दुष्काळ जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुधारित पैसेवारी पारंपरिक धोरणानुसार 31 ऑक्टोबर रोजी सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात येते. त्यावर हरकतीदेखील घेतल्या जातात. त्यानंतर अंतिम पैसेवारीच्या वेळी त्यात सुधारणा केली जाते. अंतिम पैसेवारी नोव्हेंबर महिन्याच्या तिस:या आठवडय़ात अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. नजर अंदाज आणि सुधारित पैसेवारीनंतर ही अंतिम पैसेवारी असते. त्या आधारावरच कोणते गाव दुष्काळी आहे हे ठरत असते. त्यानंतर शासनाच्या उपाययोजना राबविल्या जातात. काही मंडळे कमी होणार सुधारित आणि अंतिम पैसेवारीत काही गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक जाण्याची शक्यता महसूल प्रशासनाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ज्या तालुक्यांमध्ये 75 टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे त्या तालुक्यांमधील काही मंडळे (सर्कल) जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळातून वगळली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळी गावांची संख्या कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निर्णय बदलू नये शासनाने जिल्ह्यातील सर्वच महसुली गावे दुष्काळी जाहीर केली आहेत. आता सुधारित किंवा अंतिम पैसेवारीत हा निर्णय बदलू नये. एकही गाव कमी करू नये, अशी मागणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूणच पीक आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती लक्षात घेता गावे वगळू नयेत अशीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात पावसाची तूट 28 टक्के असताना अर्थात केवळ 70 ते 72 टक्के पाऊस झालेला असताना केवळ तीनच तालुक्यांमध्ये अर्थात अध्र्या जिल्ह्यातच दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. यंदादेखील पावसाची तूट 12 ते 15 टक्के आहे. नवापूर, शहादा व अक्कलकुवा तालुक्यांमध्ये 75 टक्केपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. नंदुरबार, धडगाव, तळोदा तालुक्यात 75 टक्केपेक्षा अधिक पाऊस झालेला असला तरी तो खरीप पिकांसाठी लाभदायक ठरला नाही. खरीप पिकांची काढणी झाल्यानंतर सरासरीच्या 20 ते 25 टक्के पाऊस झाला. त्याचा उपयोग खरिपाला झाला नाही. ही सर्व परिस्थिती पाहता पावसाच्या आकडेवारीवर आणि काही भागातील पीक परिस्थितीवर न जाता दुष्काळासंदर्भात घेतलेला निर्णयच कायम ठेवला जावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दुष्काळी गावे कमी होण्याची शक्यता
By admin | Updated: October 31, 2015 00:23 IST