जळगाव : युवती व महिलांवरील अत्याचाराच्या घटना शहरात वारंवार घडत असताना पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने, 'चलता है'च्या बेपर्वाईने सुनील सोनवणे यांचा बळी घेतला. पोलिसांनी पारदश्री, कर्तव्यकठोर भूमिका घेत आरोपी कुणाल साळुंखेला अटक केली असती आणि सोनवणे कुटुंबाशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला असता तर सोनवणे यांची आत्महत्या निश्चित टळली असती, असा जनमानसात सूर उमटत आहे. या संतापाचा परिपाक रविवारी सकाळी सोनवणे यांचे कुटुंबीय आणि आप्तांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देणे स्वाभाविक आहे. कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर अखेर मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार झाले. पण पोलिसांच्या या पश्चातबुद्धीने त्यांचे प्राण परत येणार आहेत का? पोलिसांची जबाबदारी टळणार आहे का? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करून घेतला अन्यथा सोनवणे यांचा जीव वाचला असता.
पोलीस प्रशासन संशयाच्या भोवर्यात
By admin | Updated: December 22, 2014 14:55 IST
युवती व महिलांवरील अत्याचाराच्या घटना शहरात वारंवार घडत असताना पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने, 'चलता है'च्या बेपर्वाईने सुनील सोनवणे यांचा बळी घेतला.
पोलीस प्रशासन संशयाच्या भोवर्यात
जिल्हा पोलीस अधीक्षक अनभिज्ञ
पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्याशी रविवारी रात्री ९ वाजता संपर्क साधला असता त्यांनी कुणाल साळुंखे हा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले. कुणाल हा शनिवारीच डिस्चार्ज घेऊन फरार झाल्याची माहिती डॉ.सुपेकर यांना दिल्यानंतर चौकशीनंतर कारवाईचा निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.
कोण आहे कुणाल साळुंखे?
कुणाल याने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जनसंवाद व पत्रकारिता विभागात एम.सी.जे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला असून एका दैनिकात उपसंपादक म्हणून काम करीत आहे. कुणालचे वडील हेमंत साळुंखे जिल्हा बँकेचे कर्मचारी आहेत. सोनवणे आणि साळुंखे हे शेजारी, तसेच नातेवाईक आहेत. त्यांचे एकमेकांकडे जाणे-येणे होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पोलीस कुणालच्या मागावर
कुणालला ताब्यात घेण्यासाठी त्याचे मूळ गाव असलेल्या चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव, तसेच मामाचे गाव चोपडा आणि जळगाव शहरात पोलीस कर्मचारी पाठविण्यात आल्याचे जिल्हापेठचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी सांगितले.
पोलीस चुकलेच
पोलिसांनी पीडित मुलगी व तिच्या बहिणीची चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलविले होते. त्याऐवजी त्यांच्या घरी जाऊन जबाब नोंदवायला हवे होते. सोनवणे यांच्या मुलीची कुणाल याने छेडखानी केलेली असताना पोलिसांनी त्याच्या फिर्यादीवरून उलट सोनवणे कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच सोनवणे यांचा मृतदेह ताब्यात घेताना जिल्हा रुग्णालयात उपस्थित राहण्याची माणुसकी दाखविली नसल्याचे महिला सुरक्षा समितीच्या निवेदिता ताठे यांनी सांगितले.
पटारेंवर प्रश्नांचा भडिमार व घेराव
तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर जिल्हापेठचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. नातेवाइकांनी त्यांना घेराव घालून पोलिसांच्या गुन्हा दाखल करण्याच्या कार्यपद्धतीबाबत रोष व्यक्त करून प्रश्नांचा भडिमार केला.
दोषीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करा
सोनवणे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कुणाल हेमंत साळुंखे याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्याची मागणी नातेवाइकांनी लावून धरली. तसेच सोनवणे यांच्या पत्नीचा जबाब घेण्याचीही मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस हजर, मात्र..
सकाळी १0 वाजेच्या सुमारास सोनवणे यांचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात मृतदेह घेण्यासाठी गेले होते. या वेळी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी तेथे उपस्थित होते. मात्र जिल्हापेठ पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करताना खूपच 'तत्परता' दाखवली गेली, त्या पोलीस ठाण्याचा एकही कर्मचारी तेथे नव्हता.. सोनवणे यांना 'उलटा चोर कोतवाल को डाटे' या न्यायाचा धक्का बसल्याने त्यांनी आत्महत्या केली. यामुळे नातेवाइकांच्या संतापात अधिकच भर पडली .
पोलिसांनी ना विचारपूस केली..ना सांत्वन
सोनवणे यांच्या नातेवाइकांसह मित्र परिवार रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात शवागारासमोर जमला होता. जिल्हापेठ पोलिसांनी सुनील सोनवणे यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन साधी विचारपूसही केली नाही. त्यातच मृतदेह ताब्यात घेताना एक कर्मचारीही रुग्णालयात फिरकला नाही. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले होते.
कुणाल साळुंखे फरार
कुणाल साळुंखे १७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर २0 डिसेंबर रोजी सुनील सोनवणे यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. इकडे त्या वेळी सायंकाळी सहाच्या सुमारास कुणाल डिस्चार्ज घेऊन फरार झालेला आहे. २ पीडित तरूणी आणि कुणाल साळुंखे यांची परस्परविरोधी तक्रार आल्यानंतर या प्रकरणात पोलिसांना तडजोडही करता आली असती. पोलीस परस्परविरोधी तक्रारी दाखल करून मोकळे झाले. तडजोड करण्याचा समंजसपणा दाखविला असता तर सोनवणे यांची आत्महत्या झाली नसती. सुनील सोनवणे यांच्या आत्महत्येने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांच्या मुलीच्या छेडखानीचे प्रकरण पोलिसांनी व्यवस्थित हाताळले असते तर कदाचित सोनवणेंची आत्महत्या झाली नसती, अशी चर्चा स्मशानभूमीत होती.
दोन्ही मुलींनी दिला अग्निडाग
सकाळी ११ वाजेच्या सुमारास मृतदेह ताब्यात घेऊन नेरी नाका स्मशानभूमीत दोन्ही मुलींनी सुनील सोनवणे यांना शोकाकुल वातावरणात अग्निडाग दिला. या वेळी त्यांना अश्रू आवरणे मुश्कील झाले होते. नातेवाइकांसह त्यांचा मित्र परिवार मोठय़ा संख्येने उपस्थित होता. मुक्ताईनगरातील त्यांच्या निवासस्थानीही मोठी गर्दी झाली होती.
भाऊसाहेब पटारे यांना थेट प्रश्न प्रश्न- सोनवणे यांनी मुलीच्या छेडखानीची तक्रार दिली होती. मग त्यांच्या कुटुंबीयांवरच लगेच गुन्हा दाखल का केला?
पटारे- आरोपी कुणाल साळुंखे याने मारहाणीची तक्रार दिली होती. त्यामुळे सोनवणे कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करावा लागला.
प्रश्न- कुणाल याला अटक केली आहे काय?
पटारे- त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे तीन पथक ठिकठिकाणी पाठविण्यात आले आहेत.
प्रश्न- सोनवणे-साळुंखे कुटुंबात यापूर्वी भांडण झाल्याची माहिती आहे काय ?त्याविषयी तक्रार आली होती काय?
पटारे- त्यांचे यापूर्वी भांडण झाल्याबाबत माहिती नाही. तशी तक्रारही जिल्हापेठला दाखल नाही.