बोदवड येथे साथीच्या आजारांसह डेंग्यूचे वाढते रुग्ण
बोदवड : शहरात गेल्या काही दिवसापासून ठिकठिकाणी उकिरडे साचले आहे. यामुळे दुर्गंधी तर सुटते आहे, परंतु आरोग्याची समस्याही निर्माण झाली आहे. विविध आजारांसह डेंग्यूचे रुग्णही वाढताना दिसून येत आहे.
शहरात केवळ आरोग्याची समस्या नसून पाण्याची समस्या तर कायमच आहे. भर पावसाळ्यात नळाला दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत असतो. कधी शहरातील विहिरीचे तर कधी ओडियाच्या पाईपलाईनचे पाणी मिळत आहे. तेही शुद्ध पाणी मिळत नसल्याने त्यातूनही आजार नागरिकांच्या पदरी पडत आहेत. पाणी गढूळ असते तर कधी जंतू आढळतात. दुसरीकडे शहरातील केरकचरा उकिरड्यावर साचत असून पाऊस झाल्यास गटारीचे घाण पाणी रस्त्यावरून वाहते. त्या पाण्याचे ठिकठिकाणी तळे साचते. या पाण्यातून नागरिकांना कसरत करून जावे लागत आहे. या विविध कारणाने पाण्यावर डेंग्यू, मलेरिया सारखे आजार पसरत आहेत.
नगर पंचायतकडून केर कचरा उचलणाऱ्या मक्तेदाराकडे ही दुर्लक्ष होत असल्याची ओरड होत आहे. एकूणच नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सध्या सुरू आहे.
शहरात ठिकठिकाणी कचरा पेट्या भरलेल्या असून कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लागत नसल्याने त्या कचऱ्यात मुक्त जनावरे वावर करीत आणखी घाण पसरवत आहेत.
पालिकेने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.
शहरातील जामठी रस्त्यावर गटारीचे पाणी आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते थेट गांधी चौकापर्यंत हे पाणी वाहत जात आहे.
प्रभाग क्रमांक सहा मध्ये गटारीच्या घाण पाण्याचे चक्क तळे साचले आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये भर रस्त्यावर पसरलेले घाण पाण्याचे तळे तसेच रस्त्यावर पसरलेला कचरा . (छाया : गोपाल व्यास)