लोकमत न्यूज नेटवर्क
कजगाव, ता. भडगाव : येथील कजगाव व भोरटेक शिवारातील अंदाजे आठ ते नऊ शेतकऱ्यांच्या २० एकर क्षेत्रातील बाजरी, ज्वारी, कपाशी आदी पिके डुकरांनी फस्त केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जेमतेम पडलेल्या पावसामुळे तग धरून उभे असलेले पीक डुकरांनी फस्त केल्याने शेतकरी अडचणीत आले आहे.
भोरटेक शिवारातील शेतकरी भास्कर गोपाळ वाणी यांनी आपल्या शेतात आठ एकर बाजरीची पेरणी केली होती. यातील अंदाजे पाच एकर बाजरी पीक डुकरांनी फस्त करून टाकले आहे. गेल्या वर्षीदेखील याच शेतकऱ्यांचे डुकरांच्या उपद्रवामुळे मोठे नुकसान झाले होते. याबाबत विकास अमृतकार यांनी तहसीलदार तसेच वनविभागाकडे तक्रार दिली होती. मात्र, याचा काहीच उपयोग झाला नाही.
या शेतकऱ्यांप्रमाणेच याच शिवारातील संजय चिंधा महाजन, संजय तुकाराम पाटील, दिलीप गोपाळ वाणी, सखाराम गोपाळ वाणी यांच्यासह भोरटेक व कजगाव शिवारातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
कजगाव व भोरटेक शिवारात डुकरांनी फस्त केलेली पिके.