कोरोनामुळे एसटी महामंडळाची प्रवासी सेवा गेल्या वर्षी सहा महिने ठप्प होती. यामुळे महामंडळाचे करोडो रुपयांचे उत्पन्न बुडाले. त्यामुळे महामंडळाने पर्यायी उत्पन्नाचा स्रोत म्हणून गेल्या वर्षापासून मालवाहतूक सेवा सुरू केली आहे. या माल वाहतुकीसाठी जुन्या बसेसचे ट्रकमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. या ट्रकमधून उद्योजक, व्यापारी व शेतकरीबांधवांना आपला कृषी माल राज्यासह देशभरात कुठेही वाहतूक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, ही वाहतूक करताना संंबंधित ठिकाणी माल पोहोचविल्यानंतर माल उतरविण्याकरिता, वेळेवर हमाल उपलब्ध होत नसायचे. यामुळे हे ट्रक दोन- दोन दिवस जागेवरच उभे राहायचे. परिणामी, यामुळे या ट्रकवरील चालकांना मालाच्या जबाबदारीमुळे ट्रक सोडून कुठेही जाता येत नव्हते, तसेच यामुळे मालाची चोरीचीदेखील भीती असायची. त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबाबत अनेक तक्रारी विविध विभागांतून महामंडळाकडे प्राप्त झाल्या होत्या.
इन्फो :
प्रवासाची परवानगी, मात्र अपघाताची नुकसानभरपाई नाही
एसटी महामंडळाने माल वाहतुकीच्या ट्रकसोबत हमालबांधवांना माल उतरविण्यासाठी सोबत प्रवासाची परवानगी दिली असली, तरी या ट्रकचा जर कुठे अपघात झाला, तर या ट्रकवरील हमालबांधवांच्या उपचाराच्या वा इतर कुठल्याही प्रकारची नुकसानभरपाई महामंडळाकडून दिली जाणार नसल्याचा आदेश महामंडळाने काढला आहे. याबाबत संबंधित वाहतूकदाराकडून हमीपत्र भरून घेण्याच्या सूचनाही आगार व्यवस्थापकांना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, महामंडळाच्या या अनोख्या निर्णयाबद्दल वाहतूकदारांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
इन्फो :
पूर्वी माल वाहतुकीचा ट्रक बाहेरगावी गेल्यानंतर, त्या ठिकाणी माल उतरविण्यासाठी बऱ्याच वेळा हमालबांधव मिळत नसल्यामुळे, दोन-दोन दिवस ट्रक जागेवरच उभा राहायचा, तसेच यामुळे ट्रकवरील कर्मचाऱ्यांचीही गैरसोय व्हायची. त्यामुळे महामंडळाने आता ट्रकसोबत कमीत कमी तीन हमालबांधवांनाही संंबंधित ठिकाणी माल उतरविण्यासाठी ट्रकमधून प्रवासाची परवानगी दिली आहे.
-प्रज्ञेश बोरसे, व्यवस्थापक, जळगाव आगार