लोकमत न्यूज़ नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी पिंप्राळा परिसरातील ६५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सी टू वॉर्डात दाखल करण्यात आले होते. मात्र, तासाभरातच या बाधिताचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी जीएमसीच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचे प्राण गेल्याचा आरोप करत गोंधळ घातला. हा प्रकार बुधवारी दुपारी घडला.
पिंप्राळा परिसरातील कोरोनाबाधित रुग्णाची बुधवारी दुपारी प्रकृती खालावल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी सी टू वॉर्डात रुग्णाला ऑक्सिजन लावण्यात आला. त्यानंतर काहीवेळाने रूग्णाची प्रकृती अधिकच खालावली. याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी उपचार करण्यास टाळाटाळ केल्याने रुग्णाचे प्राण गेल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला. त्यामुळे काहीकाळ कोरोना कक्षात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर डॉक्टरांनी समजविल्यानंतर गोंधळ शांत झाला.