नवापूर : शहरात पालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत पक्षपात झाल्याचा आरोप करण्यात आला. शहरातील युवकांच्या गटाकडून तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून हा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, १८ रोजी स्थगिती झालेली अतिक्रमण काढण्याची मोहीम १९ रोजी पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे.पालिकेकडून १७ रोजी अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. विविध भागातील एकूण २१ अतिक्रमणे काढण्यात आली. त्यात पक्के आर.सी.सी. बांधकाम असलेल्या नऊ इमारती व इमारतींच्या भागाचा समावेश आहे.बसस्थानक परिसरात दुपारी साडेचारला अतिक्रमण काढताना काही युवक व पालिका कर्मचारी यांच्यात वाद झाला होता. हाच धागा पकडून युवकांच्या गटाकडून मंगळवारी मूक मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.पोलीस निरीक्षक शेळके यांनाही निवेदन देण्यात आले. ठरावीक लोकांचे बांधकाम तोडणे व त्याच रांगेतल्या इतरांना सोडून देण्यात आल्याचा प्रकार शहरवासीयांनी पाहिल्याचे निवेदनात म्हटले आहे. बसस्थानक परिसरात काढण्यात आलेले अतिक्रमण नोटीस न देता काढण्यात आल्याचा आरोप करून गरिबांचा वाली कुणी नसल्याने प्रशासनाने ही कारवाई केली का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.हीच कारवाई राजकीय व्यक्तींच्या विरोधात करण्याचे धैर्य प्रशासन दाखवेल का, ही कारवाई एकतर्फी आहे. अशी कारवाई त्वरित न थांबविल्यास आंदोलनाचा इशारा प्रदीप नगराळे, आसिफ शेख, दशरथ नगराळे, संजय मावची, जहूर मकराणी, आरिफ फ्रूटवाला, भावेश वाघ, इकबाल पठाण, विजय कोकणी, उमेश पवार, सुनील पेंढारकर व सहकार्यांनी दिला आहे. (वार्ताहर)
अतिक्रमण काढताना पक्षपात
By admin | Updated: November 19, 2014 13:52 IST