लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान संचलित ब.गो. शानभाग विद्यालयात शालेय पोषण आहार योजनेत मोठा घोटाळा झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी पुण्याच्या शिक्षण संचालकांकडे केली होती. त्यानुसार शालेय पोषण आहाराच्या उपसंचालक पद्मश्री तळदेकर यांनी जि.प. शिक्षणाधिकारी यांना उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून तत्काळ कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
काय म्हटले आहे तक्रारीत...
शालेय पोषण आहार योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना पोषण आहार शिजवून दिला जावा असे आदेश आहेत. पण, जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारातील ब.गो. शानभाग विद्यालय या शाळेत शालेय पोषण आहार योजना सुरू झाल्यापासून सदर शाळेने शालेय पोषण आहार योजनेचा लाभ घेतलेला आहे. दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांना अन्न शिजवून दिलेले नाही. शालेय पोषण आहाराचे रेकॉर्डदेखील खोटे तयार केले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्याध्यापक व व्यवस्थापन मंडळाविरुध्द कारवाई करण्यात यावी, तसेच संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी, अशी मागणी तक्रादार रवींद्र शिंदे यांनी पुण्यातील शिक्षण संचालकांकडे २४ मे रोजी केली होती.
अन् शाळा दोषी आढळली...
सन २०१८ मध्ये शालेय पोषण आहार योजनेच्या तांदूळ व धान्यादी मालाच्या झालेल्या पुरवठ्याबाबत चाळीसगाव, भडगाव, मुक्ताईनगर व जळगाव या चार तालुक्यांची चौकशी केली होती. त्या घोटाळ्याच्या झालेल्या चौकशीत जळगाव तालुक्यातील शानबाग विद्यालय दोषी आढळून आले होते, असेही तक्रारीत नमूद केले आहे.
सखोल चौकशी करून अहवाल पाठवा
रवींद्र शिंदे यांच्या तक्रारीची पुण्यातील शालेय पोषण आहार उपसंचालक पद्मश्री तळदेकर यांनी दखल घेतली आहे. २८ मे रोजी त्यांनी जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी पत्र काढून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयाकडे पाठविण्याच्याही सूचना केल्या आहेत.