जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तमाम नेते गेल्या आठवड्यात चक्क एकत्र आले. त्यामुळे गावगाड्यात चर्चेला जणू उधाणच आले. गावातील चौकाचौकांत यावर कमीअधिक प्रमाणात टीका टिप्पणी झाली. गेल्या चार-पाच वर्षांत एकमेकांवर आरोप करणारी ही मंडळी एकाच ठिकाणी जमलेली पाहून खरे तर आश्चर्यच आहे. आता जिल्ह्याचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. धरणांना निधी नाही. रस्त्यांची समस्या तर कधी संपेल असे वाटत नाही. या प्रश्नावर या मंडळींनी एक दिवस एकत्र येऊन शासनाकडे कैफियत मांडावी. एवढे जर नेते मुंबईत एकाचवेळी धडकले तर पदरात दुप्पट काय तिप्पट निधी आपल्या जिल्ह्याच्या पदरात पडेल एवढे नक्की... पण यासाठी नेते एकत्र यायला हवेत... त्यासाठी एखाद्या संस्थेच्या निवडणुकीची गरज नाही... अशा चर्चा ग्रामीण भागात रंगत आहेत.
- चुडामण बोरसे.