राज्य सरकारने पाच-सहा वर्षांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजासाठी भ्रमणध्वनी दिलेले आहेत, त्यांची वॉरंटी-गॅरंटी संपलेली आहे. ते वारंवार बंद पडतात, हँग होतात. तसेच रेंज प्रॉब्लेम निर्माण होतो. नादुरुस्त झाले तर शासकीय खर्च दोन हजार रुपयांवरच लागतो. दुरुस्ती खर्च सरसकट प्रत्येक नादुरुस्त भ्रमणध्वनी झालेल्या सेविकेस मिळत नाही. त्यामुळे घरचा खर्च करावा लागतो आणि आता तर राज्य सरकारने पोषण आहार ट्रॅकर ॲप इंग्रजीत दिले आहेत. ते बऱ्याच अल्पशिक्षित सेविकांना भरणे जमत नाही. त्यामुळे फजिती होत आहे. मानसिक तणावाखाली नोकरी करावी लागत आहे. म्हणून ते मराठीत असावे, यासाठी महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना कृती समितीने गेल्या तीन महिन्यांपासून बहिष्कार टाकला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातही भ्रमणध्वनीवर काम बंद केले आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना कृती समितीने १७ पासून जुने गॅरंटी, वॉरंटी संपलेले भ्रमणध्वनी वापसी आंदोलन सुरू केले आहे.
वर्धा, भंडारा, गोंदिया, परभणी जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविकांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी परतही केलेले आहेत. त्या आंदोलनाचा भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातही दि. २३ रोजी चोपडा येथील प्रकल्प १ व प्रकल्प २ कार्यालयांवर सेविकांचे भ्रमणध्वनी परत करण्याचे आंदोलन दुपारी १२ ते २ वाजता होणार आहे. दि. २५ ऑगस्ट रोजी धरणगाव प्रकल्प कार्यालयावरही त्याचवेळेस आंदोलन होईल, असे अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अमृत महाजन, तालुकाध्यक्ष वत्सला पाटील, ममता महाजन, प्रेमलता पाटील, आदींनी कळविले आहे.