आनंद सुरवाडे
वाढत्या तक्रारी : रोज स्वच्छ मास्क वापरा, वारंवार घाम पुसण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना काळात संरक्षण म्हणून नाका - तोंडावर मास्क लावणे अत्यावश्यक असून ते आता सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, या मास्कच्या वापरामुळे चेहऱ्याला घाम येणे, खाज सुटणे असे ॲलर्जीचे प्रकारही वाढत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून समोर यायला लागल्या आहेत. यासाठी नियमित स्वच्छ धुतलेलाच मास्क वापरावा व काही अवधी तो मास्क काढून चेहरा स्वच्छ करावा, असा सल्ला त्वचा रोग तज्ज्ञांनी दिला आहे.
गेल्या दीड वर्षांपासून सर्वच नागरिक कोरोनाचा सामान करीत आहेत. या काळात संरक्षण म्हणून मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनापासून संरक्षण हवे असल्यास नाका तोंडावर अगदी व्यवस्थित मास्क परिधान करावे, असे डॉक्टर सांगतात.
मास्क आवश्यकच...पण असे करा त्वचेचे रक्षण
मास्क वापर करणाऱ्याच्या त्वचेवरही ॲलर्जीचे स्वरूप ठरलेले असते. तेलगट त्वचा असणाऱ्यांना याचा त्रास अधिक होऊ शकतो. घामामुळे फंगल इंफेक्शन होऊ शकते, त्या ठिकाणी खास येणे, पुरळ उठणे असा त्रास होऊ शकतो. अशा स्थितीत कॉटनचा मास्क वापरणे चांगले. तो नेहमी स्वच्छ करून वापरावा, वारंवार मास्कला हात लावू नये, दिवसातून बराच वेळ आपल्याला मास्क वापरावा लागत असेल तर काही वेळ काढून घाम स्वच्छ पुसून घ्यावा, महिलांनी अति मेकअप करून त्यावर मास्क घालू नये यामुळे ॲलर्जी अधिक होऊ शकते, असे त्वचाविकार तज्ज्ञांनी सांगितले आहे.
कोट
स्वच्छ मास्कच वापरा
मास्कमुळे होणारी ॲलर्जी ही तीन प्रकारांवर अवलंबून असते, एक म्हणजे वापरणाऱ्याची त्वचा, मास्क कोणत्या प्रकारचा वापरला जातोय ती आणि तिसरी म्हणजे मास्कचा आपण किती वेळ वापरतो. अशा स्थितीत पुरळ येणे, खाज सुटणे, जागा काळी पडणे असे त्रास उद्भवू शकतात. अशा स्थितीत आरोग्य कर्मचारी नसाल तर कॉटनचा मास्क वापरावा तो स्वच्छ धुऊनच वापरावा, काही काळ तो काढून चेहरा स्वच्छ करावा. - डॉ. स्नेहल लोळगे, वरिष्ठ निवासी, त्वचारोग विभाग जीएमसी
सॅनिटायझरपेक्षा साबण बरे
- वारंवार सॅनिटायझरचाही वापर केल्याने हाताला त्रास होऊ शकतो, अशा वेळी लवकर उपलब्ध होत असेल तर साबणानचे हात स्वच्छ धुवावे.
- सॅनिटायझरमध्येही ७० टक्के अल्कोहोल असल्यावरच ते विषाणूला मारू शकते.
- साबण नसेल आणि हात स्वच्छ करायचे असतील तर मात्र, सॅनिटायझर वापरावे ज्यांना ॲलर्जी आहे त्यांनी शक्यतोवर वापरू नये, मात्र, तोपर्यंत नाका-तोंडाला हात लावू नये.