जळगाव : विविध प्रकारच्या सवलत धारकांना कोरोनामुळे बंद करण्यात आलेली सवलत महामंडळातर्फे पुन्हा देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. यामुळे लाभार्थांना प्रवासात सवलत मिळणार असून, दुसरीकडे स्मार्ट कार्ड सक्तीचे करण्यात आल्यामुळे संबंंधित लाभार्थांनी ३१ मार्च २०२१ पर्यंत स्मार्ट कार्डची नोंंदणी करणे बंधनकारकही करण्यात आले आहे.
राज्य परिवहन महामंंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, विविध शासकीय पुरस्कार प्राप्त, अधिस्वीकृती धारक पत्रकार यासह इतर लाभार्थांना प्रवासात सवलत देण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून ही सवलत बंद करण्यात आली होती. यामुळे सवलत धारकांना काही महिने खाजगी वाहनांनी जादा पैसे मोजून प्रवास करावा लागला. मात्र, आता राज्य शासनाने ही बंदी उठवून, सवलत धारकानांही बसमधुन प्रवास करण्याला परवानगी दिली आहे. यामुळे संबंधित लाभार्थांना दिलासा मिळाला असून, बसमधुन सवलतीत प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे या लाभार्थांना शिवशाही या वातानुकूलीत बस मधुनही प्रवासासाठी परवानगी मिळाली आहे.
इन्फो :
तर स्मार्टकार्डसाठी ३१ मार्च अंतिम मुदत
महामंडळातर्फे बनावट पास तयार सवलतींचा लाभ घेण्याचे प्रकार निदर्शनास आले होते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महामंडळातर्फे सर्व लाभार्थाना ३१ मार्च २०२१ पर्यंत जळगाव आगारात स्मार्टकार्ड नोंदणी बंधनकरक केले आहे. त्यानंतर ज्या लाभार्यांकडे स्मार्टकार्ड नाही, अशा प्रवाशांना प्रवासात मनाई करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.