नंदुरबार : साई क्रेडिट अँण्ड मार्केटिंग कंपनीचे अनेक एजंट फरार झाले आहेत. गुंतवणूकदार त्यांच्या घरी चकरा मारत आहेत. पोलिसांकडे कुणी फिर्याद देत नसल्यामुळे पोलीस आता स्वत:हून तपास सुरू करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या कंपनीत दामदुप्पटच्या आमिषाने अनेक शिक्षक, प्राध्यापकांनीही लाखो रुपये गुंतवल्याचे आता पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे ही रक्कम कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
नंदुरबारात वर्षभरापूर्वी साई मार्केटिंग नामक कंपनी सुरू करण्यात आली होती. पुणे येथे मुख्य शाखा असल्याची बतावणी करून कंपनीने परदेशीपुरा भागात कार्यालय सुरू केले. कंपनीत पैसे गुंतविण्यासाठी आकर्षक स्वरूपात जाहिरात करण्यात आली. त्यासाठी एजंट नेमण्यात आले. एजंटांनाही घसघशीत कमिशन देण्यात आले. सुरुवातीच्या काळात गुंतवणूकदारांना नियमित परतफेड मिळू लागल्याने पैसे गुंतविणार्यांची संख्या वाढत गेली. कुणी शेकडा, कुणी हजार, तर कुणी लाखाच्या पटीत पैसे गुंतवू लागले. अखेर जे व्हायचे ते झालेच. संबंधित कंपनीचालक गेल्या आठवड्यात कार्यालयाला कुलूप लावून पसार झाला. गुंतवणूकदार हात चोळत बसले.
ज्या गुंतवणूकदारांनी ज्या एजंटाकडे पैसे गुंतवले होते त्यापैकी अनेक जण शहरातून निघून गेल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या घरी काहींनी तगादा लावला असता अनेकांच्या घरी ही बाब माहिती नसल्याचे सांगण्यात आले. आमचा संबंधही नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार हतबल झाले आहेत. पोलिसांकडे तक्रार करावयाची म्हटली म्हणजे पोलिसांच्या तपासाचे नुसतेच लचांड मागे लागेल म्हणून काही जण शांत बसून आहेत.
या कंपनीत अनेक शिक्षक, प्राध्यापक व वरिष्ठ अधिकारी असलेल्यांनीही पैसे गुंतवले आहेत. त्यांनी लाखांच्या पटीत पैसे गुंतवल्याची चर्चा आहे. एका शिक्षकाने आठ लाख रुपये गुंतवले होते. तो शिक्षक कोण? याबाबत शहरात चर्चा आहे. नोकरदारांप्रमाणे रोजंदारीवर काम करणारे, व्यवसाय करणार्यांनीही हजारो रुपये गुंतवले आहेत. त्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे.
कुणी तक्रार देण्यास पुढे येत नसल्यामुळे पोलिसांनी स्वत:हून तपास करण्याचे ठरविले असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत लवकरच मूळ सूत्रधारापर्यंत पोहचण्यासाठी पोलीस प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगण्यात आले.
संघटित होणार
दरम्यान, साई मार्केटिंगमध्ये ज्यांचे पैसे गुंतले आहेत असे गुंतवणूकदार एकत्र येऊन संघटित लढा देणार असल्याचे समजते. याबाबत कोण पुढाकार घेईल यावर मात्र कुणीही बोलण्यास तयार नाही. वैयक्तिकऐवजी संघटित लढय़ानेच याप्रकरणी यश येईल याबाबत गुंतवणूकदारांमध्ये एकमत झाले आहे.■ गुंतवणूकदारांमधील चर्चेनुसार संबंधित कंपनीचालक स्थानिक ठिकाणचा गुंतवलेला पैसा नाशिक येथील केबीसी कंपनीत दामदुप्पटसाठी टाकत होता. मात्र, केबीसीचेही दिवाळे निघाल्याने या कंपनीचा पैसा बुडाला. परिणामी गुंतवणूकदारांना देण्यासाठी पैसे शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे साई मार्केटिंग कपंनीचे दिवाळे निघाल्याची चर्चा आहे. जोपर्यंत केबीसी नियमित चालू होती तोपर्यंत साई मार्केटिंगही नियमित परतफेड करीत होती. केबीसी बंद पडली आणि साई मार्केटिंगचीही चक्रे उलटी फिरू लागल्याची चर्चा गुंतवणूकदारांमध्ये आहे.